वडगाव मावळ – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची आमदार सुनील शेळके यांनी बुधवारी (दि. 6) दिल्ली येथे भेट घेतली. त्यांच्याकडे मावळ तालुक्यातील कान्हे व मळवली येथील उड्डाणपुलांच्या कामास त्वरित सुरुवात करावी. तसेच पुणे ते लोणावळा दरम्यानची लोकलच्या फेऱ्या वाढवून रेल्वेसेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू करण्याची मागणी केली आहे.
मावळ तालुक्यातील कान्हे व मळवली या दोन्ही रस्त्यांवरील रेल्वे क्रॉसिंगवर होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी कान्हे व मळवली येथील रेल्वे मार्गावर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. परंतु वारंवार पाठपुरावा करूनही या दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांच्या कामांबाबत दिरंगाई होत आहे. या रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेल्वे प्रशासनामार्फत करण्याचे निश्चित झालेले असून, या संदर्भात रेल्वे बांधकाम विभागाने सुचविल्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने बदल करून रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.
उड्डाणपुलाच्या कामासाठी केंद्र शासन 50 टक्के व राज्य शासन 50 टक्के निधीची तरतूद करणार आहे. यातील कान्हे येथील उड्डाणपुलासाठी राज्य शासनाने 31 मार्च 2022 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 3 कोटी 15 लाख रुपयांचा आपला पहिला हिस्सा उपलब्ध करून दिला आहे. तरी देखील उड्डाणपुलाच्या कामास दिरंगाई होत असून, या उड्डाणपुलांच्या कामांना गती मिळावी. तसेच लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी या वेळी केली.