पिंपरी – महापालिकेची निवडणूक वेळेत होणार की पुढे जाणार याबाबत चर्चा सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना व आरक्षण सोडत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. तर त्यानंतर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
याबाबत आयोगाकडून महापालिकेला आदेश प्राप्त झाले असून निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर केला जाणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये प्रभागरचना जाहीर होण्याची उत्सुकता लागली आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि आरक्षण सोडत एकाच दिवशी जाहीर केली जाते. परंतु, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीची प्रक्रिया थंडावली होती. ओबीसींच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अगोदर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आरक्षण सोडतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. निवडणूक आयुक्त यु. पी. एस मदान यांनी त्याबाबतचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
महापालिका प्रशासनाने निवडणूक आयोगाला प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा सादर केला आहे. त्याला आयोगाने मान्यता दिल्यानंतर ही प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे. निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणाऱ्या प्रारूप अधिसूचनेवर विहीत कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात याव्यात. हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात यावे. प्राप्त हरकती व सूचनांवर प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून सुनावणी होईल.
सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशीसह राज्य निवडणूक आयोगास प्रारुप प्रभागरचना पाठविण्यात येईल. दुरुस्त्यासह अंतिम प्रभागरचना आयोगाला सादर झाल्यानंतर आयोगाच्या मान्यतेने अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर प्रभागासाठी आरक्षण निश्चितीचे आदेश राज्य निवडणूक आयोगामार्फत स्वतंत्ररित्या देण्यात येतील, असे निवडणूक आयोगाने आदेशात म्हटले आहे.
या आदेशामुळे थंडावलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेला अचानक गती मिळाली असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून प्रारुप प्रभाग रचनेला मान्यता मिळण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. आयोगाचा आदेश प्राप्त होताच महापालिकेच्या वतीने प्रारुप आराखडा प्रसिद्ध केला जाईल.
विलंब झाल्याने मतदारापर्यंत पोहचण्यात अडचणी
प्रभागरचना करताना महापालिका प्रशासन व निवडणूक विभागाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. त्यामुळे प्रभागरचना नेमकी कशी झाली आहे. याबाबत विद्यमान व इच्छुक यांना अद्यापतरी अंदाज आलेला नाही. त्यातच प्रभाग रचना वेळेवर प्रसिद्ध झाली नसल्याने मतदारापर्यंत पोहचण्यामध्ये इच्छुकांना अडचणी येत आहेत. नेमका प्रभाग कसा झाला आहे याचा अंदाज नसल्याने अनेकांची कोंडी झाली आहे. तर प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर कमी कालावधीत त्या मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.