आतामी (जपान) – जपानची राजधानी टोकियोच्या नैऋत्येकडील आतामी भागात पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतर आता मदतकार्याला वेग आला आहे.
या भूस्खलनामध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर किमान 20 जण पाण्यामध्ये वाहून गेले आहेत. 130 घरे आणि कारदेखील या पाण्याबरोबर वाहून गेल्या आहेत. सुमारे 1 हजार सैनिक, फायर फायटर्स आणि पोलीस मदतकार्यात तैनात झाले आहेत.
आतचतापर्यंत चिखलाखालून किमान 19 जणांना बाहेर काढण्यात आले आहे, पण अजून काही जणांचा मृत्यू झाला असल्याची भीतीही आहे, असे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी म्हटले आहे.अतामीपर्यंत पोहोचण्याच्या रस्त्यावरदेखील प्रचंड चिखल साचलेला आहे आणि तो हटवण्यासाठी कोस्टगार्डची जहाजही रवाना केली गेली आहेत.
या भागात अजूनही मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मात्र याही परिस्थितीत मदत आणि बचावकार्य सुरू राहील, असे सुगा यांनी सांगितले.