गोपीचंदची पुस्तकातून प्रकाश पदुकोन यांच्यावरही टीका
नवी दिल्ली – ऑल इंग्लंडविजेता खेळाडू व प्रशिक्षक पुलेला गोपीचंद याने आपल्या आगामी पुस्तकात अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे. माझी अकादमी सायना नेहवाल सोडून गेली, त्याचे आजही दुःख वाटते असे सांगणाऱ्या गोपीचंद यांनी सायनाच्या या निर्णयामागे माजी ऑल इंग्लंड विजेते बॅडमिंटमनपटू व प्रशिक्षक प्रकाश पदुकोन असल्याचे सांगत त्यांच्यावर टीका केली आहे.
गोपीचंद यांच्या पुस्तकाचे येत्या 20 जानेवारी रोजी प्रकाशन होणार आहे. गोपीचंद पी. व्ही. सिंधूकडे जास्त लक्ष देत असल्याने सायनाने त्यांची अकादमी सोडल्याची चर्चा तेव्हा प्रचंड गाजली होती.
मी अनेक बॅडमिंटनपटूंना मार्गदर्शन करत होतो, मात्र सायनाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. कदाचीत हीच बाब सायनाला समजाविण्यात मी कमी पडलो. सिंधूने 2012 ते 2014 या काळात फार चांगली प्रगती केली होती. पदुकोन यांनीच सायनाला हैदराबाद सोडण्यास प्रोत्साहन दिले. माझ्यासाठी हा धक्का होता. पदुकोन यांच्याकडूनच मी खेळाची प्रेरणा घेतली ते माझ्याशी असे का वागले याची मला आजही खंत आहे, असेही गोपीचंद याने व्यक्त केले.
2014 मध्ये जागतिक विजेतेपद स्पर्धेनंतर सायनाने पदुकोन यांच्या अकादमीत प्रवेश घेतला. अकादमी सोडून जाऊ नये यासाठी मी सायनाला खुप समजावले. पण ती कोणाच्या तरी प्रभावाखाली होती आणि तिचा निर्णय आधीच झाला होता. त्यामुळे मी नंतर तिला समजावणे बंद केले, असेही त्यांनी सांगतिले.
देशात बॅडमिंटनला प्रचंड लोकप्रियता मिळवून देणाऱ्या सायनाची कारकिर्द घडवण्यात गोपीचंद यांचा मोठा वाटा आहे. गोपीचंद यांनी ड्रीम्स ऑफ बिलीयन- इंडिया ऑण्ड ऑलिम्पिक गेम्स या आपल्या आगामी पुस्तकात अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पुस्ताकाचा सह लेखक म्हणून चक्क सायनाचा पती व देशाचा अव्वल बॅडमिंटनपटू पी. कश्यप याने लेखन केले आहे.