– संजय कडू
पुणे – सैनिक आणि पोलीस भरती प्रशिक्षण संस्थांचे मनामनी कारभारच लष्कर आणि पोलिसांच्या पेपर फुटीमागे सूत्रधार असल्याची बाब समोर येण्याची शक्यता पोलीस अधिकारी व्यक्त करत आहेत. त्यात अडकलेल्या सैन्य दलातील बड्या अधिकाऱ्यांनी तोंड उघडल्यास या मोठ्या रॅकेटवर प्रकाशझोत पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, संरक्षण विभागाकडून पोलिसांवर दबाव येत असल्याचे पोलीस दलात दबक्या आवाजात याबाबत बोलले जात आहे.
या अकॅडमींना कोणतेच शासकीय नियम अथवा निर्बंध लागू होत नसल्याने 90 दशकांत दहावी बारावीच्या कोचिंग क्लासने पेपर फुटीचे रॅकेट कार्यरत करून महत्त्वाचे प्रश्न म्हणून पेपर देत असत त्या प्रमाणेच या संस्था महत्त्वाचे प्रश्न म्हणून पेपर देत असल्याचे समोर येत आहे.
मिलिट्री सोल्जर रिलेशन भरतीचा परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या टोळीला लष्करातील इंटेलीजन्स आणि पुणे पोलिसांचे गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतेच जेरबंद केले. या रॅकेटमध्ये सैन्यात कार्यरत बड्या हुद्द्यावरील अधिकाऱ्यांसह काही माजी सैनिकांचा समावेश आहे. या तपासातच लष्कर भरती अकॅडमीचा “कारभार’ तपासयंत्रणेपुढे उघड झाला आहे.
सैन्य भरती प्रशिक्षण संस्था चालविणाऱ्यांचा पेपरफुटीमध्ये समावेश आहे. परीक्षेच्या एक दिवस आधीच परीक्षेचा पेपर सैनिक ऍकाडमीकडे पोहचला होता. राज्यात सुमारे 400 ते 500 सैनिक, पोलीस भरती प्रशिक्षण संस्था आहेत. यातील काहींचे वसतीगृह, लष्कर प्रशिक्षण केंद्र आहेत.
राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्हयातील मुले प्रामुख्याने आर्मी, बीएसएफ, सीआरपीएफ, सीएसएफ, आयटीबीपी, पोलीस अशा विविध भरतीसाठी मेहनत घेत असतात. ही बाब लक्षात घेऊन भरती प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमी वाढत गेल्या. सैनिक अकादमी चालविणारे हे प्रामुख्याने भारतीय लष्कर अथवा पोलीस खात्यातील निवृत्त अधिकारी, कर्मचारी असतात. ज्या युनिट मधून ते निवृत्त झाले आहे त्याठिकाणचे संपर्क वापरुन तसेच त्यांचे जे सहकारी सैन्यात कार्यरत आहे त्यांची मदत घेऊन ते सैन्य भरती प्रशिक्षण ऍकॅडमीची व्याप्ती वाढवितात.
एखादा ठिकाणी स्थानिक पातळीवरील उमेदवारांकरिताच भरती प्रक्रिया असतानाही, बनावट कागदपत्रांचा आधार घेत ऍकडमी चालक दुसऱ्या ठिकाणचे उमेदवारांचा भरती प्रयत्न करतानाही दिसतात. मुलांना लष्करात भरती करु असा विश्वास निर्माण करुन भरती प्रक्रियेकरिता आर्थिक देवाण-घेवाण करुन गैरव्यवहाराचे अनेकदा उघडकीस आले आहे. मार्च 2017 मध्ये ठाणे गुन्हे शाखेने सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी 20 संशयितासह सुमारे 350 विद्यार्थ्यांना अटक केली होती. फलटण येथील माजी सैनिक धनाजी जाधव याने राजे छत्रपती ऍकडमीचे माध्यमातून शासकीय नोकरीचे अमिष दाखवत प्रशिक्षणार्थींकडून पैशांचे देवाणघेवाण केल्याचा प्रकार उघड झाला होता.