गाडी हाय-वेला लागली आणि गाडीने वेग घेतला. शहरातून बाहेर पडेपर्यंत गर्दी होती. हाय वे वर वाहने होती पण लेन प्रमाणे व्यवस्थित धावत होती. मी मागे टेकून आरामात बसले. पण मला बसून झोप येत नाही म्हणून आजूबाजूचा निसर्ग बघत मी नेहमी प्रवास करते.
उन्हाळा जाणवू लागला होता. रस्त्याच्याकडेची झाडे थोडी तहानलेली वाटत होती. पण रस्त्यावर मध्ये लावलेली बोगनवेल मात्र छान बहरली होती. तिचे रंगबेरंगी रूप डोळ्याला सुखवत होते. कडेला कुठे बहावा आपली सोनझुंबर डोलवत होता, तर कुठे एखादा गुलमोहर लालबुंद फुलांनी लगडला होता. त्यातच मध्ये खूप बोरीबाभळी पसरलेली दिसत होती. मनात आलं की बाभळीच्या झाडांना कोण पाणी घालत असेल.
गाडी एका ठिकाणी थांबली. रस्त्याचे काही काम सुरू होते. ड्रायव्हर म्हणाला, “मॅडम, चहासाठी गाडी थांबवू का?’ सवयीने त्याला माहीत होतं. मी लगेच हो म्हटले. गाडी लावून तो आतमध्ये बघायला गेला. मी बाहेर येऊन थांबले. रस्त्यावर काम सुरू होते, तिथल्या कामगारांचे संसार तिथेच पलीकडे मांडलेले दिसले.
ऊन वर येऊ लागले होते. पलीकडे चुलीवर एक लग्न झालेली तरुण मुलगी भाकरी थापत होती. त्याचा छान लयीत आवाज येत होता. तिचा नवरा बहुतेक जवळपास कुठे गेला असावा. तो आला तेव्हा त्याच्या हातात एक छोटी दुधाची पिशवी आणि ग्लुकोजचा पुडा होता. तो आलेला दिसताच त्याची तीन मुले पळत पळत आली. ती तिथेच पलीकडे खेळत होती. मोठा अंदाजे 4 वर्षांचा असावा, मुलगी दोन-अडीच वर्षांची आणि धाकटा तर नीट उभाही राहात नव्हता. तो रांगतच आला.
तिघांच्याही अंगावर पूर्ण कपडे नव्हते. मातीत खेळून ती मळलेली होती. रंगानेही फार उजळ वगैरे नव्हती. पण तब्येतीने छान होती. स्वतःच सर्व करीत होती. मोठा मुलगा एक तुटकी बॅट आणि फुटका चेंडू घेऊन खेळत होता. ती मुलगी… तिचा निम्मा फ्रॉक फाटलेला होता. केस विंचरलेले नव्हते. तेलाचा तर पत्ताच नव्हता. एक गुलाबी रंगाची रिबन अर्धवट सुटलेली होती. ती त्याला बॉल टाकीत होती आणि बॉल जोरात गेला की दोघेही छान हसत होते. ते तान्हुल तर उघडच होतं. ते तिथं वाळूच्या ढिगाऱ्यावर बसून टाळ्या वाजवत होतं. मी या दृश्यात इतकी रमले की मला चहाचाही विसर पडला.
ते कुटुंब निरखताना मनात असंख्य विचारांची गर्दी झाली. ते आईवडील झाले होते; पण वयाने लहानच दिसत होते. हातावर पोट आणि पाठीवर संसार घेऊन फिरणाऱ्या त्या कष्टकरी कुटुंबाकडे पाहताना मला नुकत्याच वाटेत दिसलेल्या बोरीबाभळी आठवल्या. कोणतीही निगा नसताना वाढणाऱ्या. ही तर जिवंत माणसं. शिक्षणाचा पत्ता नाही. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पण वानवा. दिवसरात्र कष्ट उपसणारे हे लोक आणि त्यांची चिमुकली पाहताना… मला बाबा गाडीतून, स्वतःच्या गाडीतून किंवा स्कूटरवरून जाताना दिसणारी असंख्य मुले आठवली.
किती जपतात आईवडील मुलांना. छान छान कपडे, खेळणी, बूट, मोजे, उकळलेले पाणी, वरणभात, पोळी भाजीचा डबा, सुकामेवा, फळं शिवाय हट्ट केलाच तर पेप्सी, वेफर्स असे चटपटीत पदार्थ दिमतीला असतातच. इतकी जपणूक करून लहान मुलांच्या दवाखान्यात याच मुलांची गर्दी असते.
मुलांसाठी नवस करणारे उच्च शिक्षित, सुसंस्कृत सधन घरातील आईवडील आणि ही रस्त्यावर वाढणारी मुले पाहिली की प्रश्न पडतो… कोण बरोबर आहे?शहरात फिरताना देखील सिग्नलवर पिशव्या, गजरे, कधी छोटी खेळणी विकणारी, नाही तर डोंबाऱ्याचा खेळ करणारी लहान मुले पाहिली की असेच प्रश्न भेडसावतात. परवा रेडिओवर एक मुलाखत ऐकली. एक 21 वर्षांचा तरुण मुलगा तो या मुलांसाठी धडपडतो आहे. त्यांचा दादा बनून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे. त्यांना स्वच्छ कपडे, वह्या पुस्तके, कधी खाऊ खेळणी मिळण्यासाठी प्रयत्न करतो आहे.
हे ऐकून अजूनही आशा संपली नाही असे वाटले. असे अनेक दादा तयार झाले तर कदाचित भविष्य बदलू शकेल. शिक्षणाने त्यांना उज्ज्वल भविष्यकाळ अनुभवता येईल. गरज आहे संवेदनशील कृतीची. ही कोवळी आयुष्य रस्त्यावरच करपून जाण्यापूर्वी, थोडी माणुसकी दाखविण्याची.
जेव्हा रस्त्यावर किंवा सिग्नलला ही अशी मुले दिसणार नाहीत तेव्हाच खऱ्या अर्थाने आपली प्रगती झाली, असे म्हणावे लागेल. नाहीतर बोरी बाभळीच्या झाडांसारखी कोणतीही निगा न राखता हे रान वाढतच राहील…
आरती मोने