पुणे (प्रतिनिधी) : पुणे विद्यापीठाच्या सिस्टीम मधून विधी शाखेचा अंतिम वर्षाचा पेपर गायब झालेला आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षा पार पडत आहेत परंतु यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठ प्रशासनाकडे १४ हजार पेक्षा अधिक तक्रारी उपलब्ध झालेल्या असून त्यावर काय उपाययोजना करणार याबाबत विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण दिलेलं नाही. या पार्श्वभूमीवर अनेक समस्यांबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने(अभाविप) विद्यापीठात पीपानी वाजवा आंदोलन केले.
दरम्यान, बीए एलएलबी अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठ पूर्वी देण्यात येणारी बीए ची पदवी मिळणार नाही असे सांगत आहे. तसेच इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाचे गुण गृहीत धरून उत्तीर्ण केले जाईल असे प्रशासन सांगत आहे. परंतु, अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊन देखील अशा पद्धतीचा निर्णय का घेत आहे? अशा अनेक समस्यांबाबत ‘अभाविप’कडून पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारती जवळ आंदोलन करण्यात आले.