मुंबई : राज्यात अर्थ संकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यातच पहिल्या दिवशी राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी हिंदुत्व, शेतकरी, महागाई, स्वातंत्र्य लढा यावरून भाजपावर टीकास्त्र सोडले. चर्चेवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून तुकाराम महाराजांच्या अभंगातील पाहिजे जातीचे येरेगाबाळे न कामाचे ही ओळ ऐकवली होती. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी बाबरी पडल्यावर येरेगबाळे पळून गेले अशी आठवण करुन देत शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही अशा शब्दात समाचार घेतला. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन सपा नेते अबू आझमी संतापले असून त्यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला आहे.
अबू आझमी म्हणाले,’उद्धव ठाकरे आता केवळ एका पक्षाचे प्रमुख नसून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. कालच्या भाषणात ते जे काही बोलले ते चुकीचं होतं. एका अपराधासाठी ते स्वतःला श्रेय घेत आहेत. अशात मुस्लिम मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, असं आवाहन आझमी यांनी केलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन राजकारणात चांगलाच कलगीतुरा रंगलेला दिसून येत आहे त्यांच्या या वादग्रस्त विधानावरून महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी नाराजी जाहीर केली आहे. संजय निरुपम यांनी ट्विट करत हा कोणत्या किमान समान कार्यक्रमाचा भाग आहे? अशी संतप्त विचारणा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला केली आहे. संजय निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत बाबरी पाडल्याचा आनंद साजरा केला आणि तिथे उपस्थित काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार भाषणाचा आनंद घेत होते. हा कोणत्या किमान समान कार्यक्रमाचा भाग आहे?”. असा खोचक सवालही विचारला आहे