नवी दिल्ली: सध्या देशावर आर्थिक संकट ओढावलेले आहे. या आर्थिक मंदीमुळे देशाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान देशातील सरकारी बॅंकांच्या घोटाळ्यांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यंदाच्या वर्षातच सहा महिन्यांच्या काळात सरकारी बॅंकांमध्ये तब्बल 958 अब्ज रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेतील भाषणात एका प्रश्नावेळी विचारलेल्या उत्तरावर माहिती दिली आहे. सितारमण यांनी राज्यसभा सभागृहात बॅंक घोटाळ्याविषयी सविस्तर माहिती दिली.
सरकारी बॅंकांकडून एप्रिल ते सप्टेंबर या सहामाही कार्यकाळात घोटाळा आणि फसवणुकीसंदर्भातील 5743 तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. मागच्या वर्षी करण्यात आलेल्या घोटाळ्याचीच सर्वात जास्त प्रकरणांचा यामध्ये समावेश आहे. तर, या वर्षी 1 हजार प्रकरणांध्ये 25 अब्ज रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती निर्मला सितारमण यांनी दिली आहे.
भारतीय स्टेट बॅंकेकडून सर्वात जास्त 254 अब्ज रुपयांच्या घोटाळ्याची तक्रार करण्यात आली आहे. यासोबतच पंजाब नॅशनल बॅंकेने 108 अब्ज कोटी रुपयांच्या घोटाळ्याची तक्रार दिली आहे. तर, बॅंक ऑफ बडोदाने 83 अब्ज रुपयांच्या घोटाळा झाल्याची माहिती दिली. याविषयी बोलताना निर्मला सितारमण म्हणाल्या की, या बॅंकांचे नुकसान भरुन काढण्याचा सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे. यासोबतच बॅंकांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी उपाय केले जातील असेही त्या म्हणाल्या आहेत.