पुणे -“महापरीक्षा’ पोर्टलमार्फत झालेल्या परीक्षेत मैदानी चाचणीत गैरहजर उमेदवारांची वनरक्षकपदी निवड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या भरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप अन्य उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा “महापरीक्षा’ पोर्टलच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या पोर्टलद्वारे महिनाभरापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील वनरक्षक पदाच्या भरतीप्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात आली. दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये जे उमेदवार परीक्षेमध्ये अनुपस्थित होते, त्यांची निवड झाल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. याबाबत एमपीएससी स्टुडंट राईट्सचे महेश बडे म्हणाले, “सरकारने जिल्हा दुय्यम मंडळ बरखास्त करून महापरीक्षा पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. या पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होऊन उमेदवारांची निवड केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. औरंगाबाद येथील परीक्षेतील झालेला प्रकार गंभीर असून सरकारने तत्काळ महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात याव्यात.’