मुंबई – महाराष्ट्रात भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्याने पक्षाच्या प्रदेश मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सेलिब्रेशनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुपस्थित होते. यातून त्यांच्यातील नाराजी स्पष्ट दिसून आल्याचे मानले जात आहे. भाजप श्रेष्ठींनी त्यांना सक्तीने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारयला लावून त्यांचा जाणिवपुर्वक अवमान केल्याची भावना निर्माण पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
केवळ पक्षादेश म्हणून कमी महत्वाचे पद स्वीकारले
त्यांनी केवळ पक्षादेश म्हणून हे कमी महत्वाचे पद स्वीकारले असेही सांगितले जाते. त्यामुळे ते पूर्ण नाराज असल्याचेही वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सेलिब्रेशन मधील गेैरहजेरीचीही आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
‘नवीन सरकारमध्ये असणार नाही’ फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर केंद्राचा हस्तक्षेप
एक तर फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री म्हणून करण्यात आल्यानंतर राज्यात मोठीच खळबळ उडाली होती. ज्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी ही घोषणा केली त्याच पत्रकार परिषदेत आपण नवीन सरकारमध्ये असणार नाही असेही फडणवीस यांनी स्व:तच स्पष्ट केले होते. त्यानंतरही त्यांना शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये भाजप श्रेष्ठींनी त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला भाग पाडले याचेही अनेकांना आश्चर्य वाटले.
औपचारीकता म्हणून प्रदेश भाजप कार्यालयात सेलिब्रेशन
भाजप समर्थकांमध्ये तर या निर्णयाने पूर्ण नाराजीच पसरली. त्यामुळे आपल्या पक्षाचे सरकार स्थापन होऊनही भाजप समर्थकांमध्ये कोठेच सेलिब्रेशन झालेले दिसले नाही. केवळ औपचारीकतेचा भाग म्हणून प्रदेश भाजप कार्यालयात सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले. त्यालाही फडणवीसांनी दांडी मारल्याने यातून येत्या काही काळात राज्यात पुन्हा वेगळे नाट्य घडणार काय याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.
राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीलाही अनुपस्थिती
हैदराबाद येथे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक होत आहे. तथापि ते त्यालाही उपस्थित राहणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र राज्यातील सध्याच्या घडामोडींमुळे ते तेथे उपस्थित राहू शकणार नाहींत अशी माहिती पक्षश्रेष्ठींना कळवण्यात आली आहे.