तीन-चार वर्षांपूर्वी “टुकडे-टुकडे गॅंग’ हा शब्द खूपच फेमस झाला होता. आज तो फारसा ऐकायला मिळत नसला, तरी त्या काळात विशेषतः हिंदी वृत्तवाहिन्यांनी या गॅंगचे कारनामे हिरीरीनं लोकांसमोर आणले होते. काही दिवसांनी हे लोण हळूहळू कमी झालं आणि काही नवे शब्द ऐकायला मिळू लागले. परंतु “टुकडे-टुकडे’ गॅंगमधले लोक खरंच कोण आहेत?
गृह मंत्रालयाला त्यांची ओळख पटलीये का? किंवा त्यांची ओळख पटवण्यासाठी एखादी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग सिस्टिम (एसओपी) तयार केलीये का? या गॅंगचा उल्लेख करताना त्यामागे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एखाद्या संस्थेकडून मिळालेली माहिती असते का? या गॅंगच्या सदस्यांची यादी तयार केलीये का? असे प्रश्न माहितीच्या अधिकारात विचारले गेले तेव्हा “आमच्याकडे या गॅंगबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही,’ असं उत्तर केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलं होतं. त्यावेळी ही गॅंग कदाचित अदृश्य असावी. आज मात्र ती उघडउघड दिसू लागलीये. माणसं मारायची आणि मृतदेहाचे तुकडे-तुकडे करून विल्हेवाट लावायची, हे पहिल्यांदा ऐकताना अमानवी वाटलं असलं तरी आता या घटना वारंवार घडू लागल्यात.
दिल्लीत श्रद्धा या तरुणीचा क्रूरपणे खून करून आफताब या तिच्या प्रियकराने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि रोज थोडे-थोडे तुकडे जंगलात फेकून दिले. तब्बल सहा महिन्यांनंतर ही घटना उघडकीस आली.
हीच नव्या “टुकडे-टुकडे गॅंग’ची सुरुवात मानता येईल. मृतदेहाची विल्हेवाट लावणं सोपं जावं म्हणून आता जणूकाही हा “ट्रेन्ड’च बनू लागलाय की काय, अशी भीती वाटण्याजोग्या घटना घडू लागल्यात. जयपूरच्या अनुज शर्मा नावाच्या 32 वर्षीय तरुणाला पोलिसांनी त्याच्या थोरल्या काकीच्या हत्येप्रकरणी अटक केलीये. चुलत बहिणींना तो रक्ताचे डाग धुताना दिसला म्हणून संशय आला. त्यानं हे कृत्य केलं असेल, यावर अजूनही अनेकांचा विश्वास बसेना झालाय. बी.टेक. झालेला अनुज गेल्या वर्षभरापासून हरे कृष्णा मूव्हमेन्टशी संबंधित असल्याचं सांगितलं जातंय. बारीक केस कापलेले, डोक्यावर शेंडी आणि हातात सतत जपाची माळ असा हा तरुण. त्यानं त्याच्या काकीच्या मृतदेहाचे 8 भाग करून त्यांची विल्हेवाट लावली, असं पोलीस सांगतात.
चाकूने हाडं कापता येईनात तेव्हा ग्रॅनाइट कटर वापरल्याची आणि मुख्य म्हणजे ही कल्पना दिल्लीच्या घटनेवरून सुचल्याची कबुली अनुजनं दिलीये म्हणे! झारखंडमधल्या साहेबगंज शहरातील दिलदार अन्सारीने तर आफताबला मागे टाकून बायकोचे 50 पेक्षा जास्त तुकडे केले. त्यासाठी त्यानं इलक्ट्रिक कटर वापरला. पोलिसांना आतापर्यंत 18 तुकडे मिळालेत. दिलदारचं हे दुसरं लग्न होतं आणि पत्नी रिबिका आदिवासी समाजातील होती.
प्रेयसीला मारणारा आफताब असो, धार्मिक कार्यक्रमाला जाण्यास नकार दिल्यामुळे काकीला मारणारा अनुज असो किंवा घरात सतत भांडणं होतात म्हणून पत्नीला संपवणारा दिलदार असो, या तीनही घटनांमध्ये “टुकडे-टुकडे फॉर्म्युला’ कॉमन आहे आणि मृतदेहाची विल्हेवाट लावणं सोपं व्हावं म्हणून तो वापरलाय. भविष्यात असा पायंडा पडून अशा प्रकरणांची संख्या वाढू नये आणि माहितीच्या अधिकारात कुणी “टुकडे-टुकडे’विषयी विचारल्यास या महाभागांची माहिती देण्याची वेळ येऊ नये, इतकंच!
हिमांशू