हिमांशू
कुणी सरकार देता का सरकार? एक राज्य तुफानाच्या तडाख्यानं हादरलंय. “येरे… येरे…’ म्हणून बोलावल्यावर कधीच न येणाऱ्या आणि न बोलावता मुद्दाम येणाऱ्या पावसाच्या सरींनी भिजून थरथरलंय. सरकारच्या दयेवाचून अनेक अभागी शेतकरी डोंगरा-डोंगरात, शेताशिवारात, गुडघाभर चिखलात केविलवाण्या नजरेनं वाट पाहताहेत कशाची तरी… कुणाची तरी… खरंच सांगतो बाबांनो, हे राज्य आता थकून गेलंय.
एका रात्रीत हजारो वृक्षांची कत्तल करणाऱ्या अजस्र यांत्रिक करवतीच्या तावडीतून बचावलेल्या झाडा-झुडपात, जेसीबीनं कापलेल्या भीतीदायक कडेकपाऱ्यांत, अर्धं अधिक तुटून गेलंय. समुद्राच्या लाटांवरती, वणव्याच्या जाळावरती झेप घेऊन, झुंजून आता स्वस्थ बसून वाट पाहतंय… कधी होईल मेगाभरती? तरुणांच्या झुंडीच्या झुंडी शोषून घेतल्यात सोशल मीडियाच्या महाराक्षसानं व्हर्च्युअल विश्वात… कधीच “सोशल’ न होण्याचा शब्द घेऊन! तिकडे शेताशिवारात अवकाळी पावसानं भिजून काळी पडलीत पिकं आणि इकडे अस्वच्छ गल्लीबोळात भविष्यातल्या स्मार्ट सिटीची वाट पाहता पाहता थिजून गेलेत हजारो, लाखो डोळे… आम्हा पामरांना महाल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैलीमधली भेट नको, पंख मिटून पडण्यासाठी नटसम्राटासारखी आरामखुर्चीही नको. फक्त तुमची संगीत खुर्ची एकदाची थांबवा बाबांनो… नटसम्राटाला मागच्या अंगणात सरकारांसाठी तुळशी वृंदावन हवं होतं.
आमच्या बाल्कनीत तुळसच नसल्यामुळं आम्हाला तेही नको… हवंय फक्त एक सरकार… कुणी देता का?
सरकार कोणतं हवं? हे हवं की ते हवं? यांचं हवं की त्यांचं हवं? यांचं-त्यांचं एकत्र हवं की त्यांचं-यांचं एकत्र हवं? हे ठरवण्याचा हक्क आम्ही गमावलाय. चूक आमचीच आहे बाबांनो. स्पष्ट बहुमताची सवय लागलेली तुम्हाला आणि आम्हाला मात्र कधीच, काहीच स्पष्ट दिसत नाही. तुम्हीच अधू केलीत नजर आमची आणि त्याच क्षीण नजरेतून आम्हाला जे दिसलं ते बटण आम्ही दाबलं. आपण घरातले आहोत; पण घर आपलं नाही, ही रुखरुख तुम्हाला लागत नसली, तरी आम्हाला आता ती लागून राहिलीये.
नात्यागोत्यांना तसा अर्थ असतोच कुठे? चार माणसं एका छताखाली आणि चार भिंतींच्या आडोशाला राहतात, म्हणून आपण त्याला घर म्हणतो. तुम्ही कुणाचीही निवड करा सोबत राहण्यासाठी… पण बाबांनो, एक घर करा! आभाळ पाठीवर घेऊन फिरणाऱ्या हत्तींना आम्ही कधीच काही विचारलेलं नाही; पण तरी आम्हाला हे माहीत आहे, की कुणीच कुणाचं नसतं! तुम्हीसुद्धा हे सत्य लवकरात लवकर स्वीकारा आणि कोणीतरी दोघं-तिघं एकदाचे एकत्र या. कुणीच कुणाचं नसतं, हे आम्हाला मान्य असलं, तरी कुणीतरी आपल्यासाठी खुर्चीवर बसतं, हा आमचा समज खोटा नका ठरवू!
विधानसभा, लोकसभा त्रिशंकू होऊ शकते, हे आम्हाला माहीत होतं. आज तर राज्य त्रिशंकू झालंय. वादळवाऱ्यात, परतीच्या पावसात, थंड पडलेल्या उद्योगविश्वात, बॅंकांच्या रिकाम्या तिजोऱ्यांत, “नो व्हेकन्सी’च्या फलकांत एकच दिलासा असतो… कुणीतरी आहे! तो दिलासा लवकरात लवकर द्या बाबांनो… एकीकडे ज्यांनी आम्हाला न विचारता आमची मतं नोंदवली ते एक्झिट पोलवाले आम्हाला विसरतात आणि दुसरीकडे ज्यांनी आम्हाला मतं मागितली ते तुम्ही आम्हाला विसरता, हा कुठला न्याय?