– हिमांशू
कुणी काहीही म्हणा, आम्ही तसूभर बदलणार नाही. आम्हाला काही ऐकूच येत नाही असं समजा ना! “संचारबंदी’ या शब्दाचा अर्थ आम्हाला कुणी शिकवण्याची गरज नाही. ही मुक्त संचारबंदी आहे. दिवसभर घरात कोण बसणार? आणि मोकळ्या रस्त्यांचा तरी उपयोग काय? यासाठी का रोड टॅक्स भरलाय आम्ही? आमची गाडी रस्त्यावर येऊ शकत नसेल तर आम्ही रस्त्यावर येणार आणि टेनिसचा बॉल घेऊन क्रिकेट खेळणार. आम्हाला कुणी “होम आयसोलेट’ वगैरे ठरवू शकत नाही.
असेल आमच्या घरात एखादा पेशंट. म्हणून काय संपूर्ण कुटुंबानं घरातच राहायचं की काय? संचारस्वातंत्र्य वगैरे काही आहे की नाही? आणि एखाद्याचा वाढदिवस नेमका याच काळात आला तर त्याने काय करायचं? तुमचा लॉकडाऊन आडवा आला म्हणून याही दिवशी घरात हिरमुसून बसायचं की काय? अजिबात जमणार नाही! आम्ही रस्त्यावर गर्दी जमवून केक कापणार! आमचा जन्मदिवस हाच मरणदिवस ठरू नये, याची जबाबदारी प्रशासनाची आणि शासनाची. त्यांना व्यवस्थित नियोजन करायला येत नाही, यात आमचा काय दोष? रस्त्यावरून अनेकजण चाललेले असतात; पण पोलीस नेमके आम्हालाच कसे हो पकडतात? नको-नको ती चौकशी करतात? कुठे चालला, का चालला, विचारतात.
परवाच वीस पादचारी आणि चार वाहनचालकांमधून माझी एकट्याची निवड केली होती चौकशीसाठी!
नियम दाखवायचे तर सगळ्यांना दाखवा. आम्हाला एकट्याला नियम दाखवणार असाल, तर आम्ही तुम्हाला कात्रजचा घाट दाखवू. आम्हाला या देशातल्या राजकारण्यांनी खूप चांगला संदेश त्यांच्या कृतीमधून दिलाय. एकाने गाय मारली की आपण वासरू मारायला मोकळे असतो, असा तो संदेश आहे. आम्ही त्याचं तंतोतंत पालन करतो. एवढं सुंदर लॉजिक जगात कुणीच कुणाला दिलं नसेल. पण आमचे राजकारणी लोक अत्यंत हुशार नि चाणाक्ष.
त्यामुळे जेव्हा आमचं काही चुकतं, तेव्हा आम्ही सुधारण्याऐवजी आणखी कोण-कोण, कधी-कधी चुकलं होतं, याचा अभ्यास सुरू करतो. इसवी सनापूर्वी जरी कुणी चुकला असेल, तर आम्ही लगेच ओरडतो, “”इ.स.पू. 295 सालात त्या अमक्या-तमक्यानं असं केलं होतं, ते चाललं वाटतं तुम्हाला! आम्ही केलं की लगेच बोंब ठोकताय!” सबब आतातरी प्रशासनाने आमच्यावरचं लक्ष हटवावं आणि आपलं मुख्य काम करावं. तिकडे इंजेक्शनचा काळाबाजार चाललाय, तो कुणी रोखायचा? ऑक्सिजन मिळत नाहीये, तो कुणी आणायचा? रुग्णालयांमधले बेड पुरेनासे झालेत. जादा बेड उपलब्ध कुणी करून द्यायचे? ही महत्त्वाची जबाबदारी सोडून प्रशासन आमच्याच पाठीमागे का लागतं, कळत नाही! आम्हाला काही झालं तर यंत्रणा तयार नको?
नेतेमंडळींचं तर कौतुक काय सांगावं! एकतर गायब होतायत किंवा प्रेस कॉन्फरन्स घेतायत. एकाच विषयावर, एकाच दिवसात पाच-पाच प्रेस कॉन्फरन्स राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी होतात. बातम्यांचं दळण चोवीस तास सुरू असतं. काय बंद पडलं, सांगा! आता म्हणतायत, आम्ही ऐकत नाही म्हणून लॉकडाऊन करणार… करा एकदाचा लॉकडाऊन! राज्याचा लॉकडाऊन आणि केंद्राचा लॉकडाऊन यात नेतेमंडळींना फरक दिसत असेल. आम्हाला काय फरक पडणार? आम्ही बिघडलेलो नाही, सबब सुधारणारही नाही!