संकट कधीच एकटं येत नाही याचा अनुभव बऱ्याच वेळा आपल्याला येतो. अनेकदा एका संकटाच्या तावडीतून मान सोडवून घेईपर्यंत दुसरं येऊन धडकतं आणि मुकाबला करण्यात बरीच शक्ती खर्ची पडते. संकट व्यक्तिगत असो वा सामूहिक, त्याच्याशी लढताना एकमेकांना मदत करणं हाच माणूस असल्याचा खरा पुरावा. अर्थात, आपल्याकडे सुखवस्तू घरांमध्ये संकटाची तीव्रताच जाणवत नसल्यामुळे सध्या दोन टोकाची चित्रं दिसतायत. सुखवस्तू घरांमधल्या समस्याच वेगळ्या आहेत.
उदाहरणार्थ, घरात बसून काय करायचं, ही समस्या ज्याला घरच नाही त्याला जाणवणार नाही. पिझ्झाची डिलिव्हरी सुरू झाली असली, तरी एवढ्यात तो खाणं सेफ ठरेल का, हा प्रश्न पिझ्झा हा शब्दच माहीत नसलेल्या माणसाला पडणार नाही. पत्नीला मॅंगो कुल्फी बनवून खाऊ घालणाऱ्या पतीचं कौतुक पत्नीला आणि मुलांना जगवायचं कसं, याची भ्रांत असलेल्या माणसाला असणार नाही. हीच ती दोन टोकाची चित्रं. या चित्रांमधलं अंतर नजीकच्या काळात प्रचंड प्रमाणावर वाढेल आणि त्याचे अनेक दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा जागतिक अन्नपुरवठा कार्यक्रमानं (डब्ल्यूएफपी) दिलाय. उपासमार हे आपल्या पुढ्यात वाढून ठेवलेलं एक गहिरं संकट आहे. लॉकडाऊनमुळे गरिबी वाढणार असली, तरी त्यापूर्वीच आपल्याकडे ती मोठ्या प्रमाणावर होती, असं आकडेवारी सांगते. अर्थात, कोणत्या एजन्सीचा डेटा स्वीकारायचा, हा ज्याचा-त्याचा प्रश्न!
कोंबडं झाकून ठेवलं तरी उजाडायचं राहात नाही, असं म्हटलं जातं. जगातल्या वेगवेगळ्या रेटिंग एजन्सीज् वेगवेगळे निकष लावून डेटा मांडत असतात. आपण सोयीचा डेटा उचलतो, पाठ थोपटून घेतो आणि गैरसोयीचा डेटा केवळ नाकारून थांबत नाही, तर त्यामागे आपल्याला षड्यंत्रही दिसतं. मातृभूमीवरचं हे प्रेम स्वाभाविक असलं तरी व्यावहारिक आहे का, हे मात्र तपासावं लागतं. जगात उपासमारग्रस्त लोकांची संख्या प्रचंड आहे आणि त्यातले 23 टक्के भारतात राहतात, अशी एक आकडेवारी आहे. अर्थातच, करोनापूर्वीची. जागतिक उपासमार निर्देशांकात 117 देशांच्या क्रमवारीत गेल्या वर्षी आपला क्रमांक 102 होता. या पार्श्वभूमीवर करोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे या संकटात किती मोठी भर पडू शकते, याचा ढोबळ अंदाज बांधणं सहज शक्य आहे. रोजगार गमावणाऱ्यांची संख्या लाखांमध्ये नसून कोटींमध्ये आहे. अनेकांकडील “श्री’ शिल्लक आताच संपलेली आहे. केवळ गरीबच नव्हे तर कनिष्ठ मध्यमवर्गसुद्धा होरपळू लागलाय. फक्त हा वर्ग स्वाभिमानी असल्यामुळे आपली अडचण सांगत नाही, एवढंच.
रोकडटंचाईमुळे बसणारे हे चटके आगामी काही महिन्यांत वाढत जातील आणि त्यातून नवनवीन समस्या उद्भवतील, असं जाणकार सांगतात. अर्थात, जाणकार कुणाला म्हणायचं, हासुद्धा ज्याचा-त्याचा प्रश्न!
आपण इतके कमनशिबी आहोत की, उन्हाळ्यात करोनाचा विषाणू टिकणार नाही हा अंदाज तर खोटा ठरलाच आहे; शिवाय वाढत्या उन्हाळ्याबरोबर पाणीप्रश्नही गंभीर होत चाललाय. कोरड्या घशासाठी घोटभर पाणी मिळवताना सोशल डिस्टन्सिंग वगैरे शब्दही लक्षात राहात नाहीयेत. त्यातच कधीही उन्हाळ्यात न येणारी टोळधाड आपल्या देशात यंदा उन्हाळ्यात घुसलीय. उत्तरेकडील राज्यांनंतर आता महाराष्ट्रातील पिकंही ती फस्त करू लागलीय. संकटमालिका मोठी आहे. स्वतःपुरतं पाहून ती भेदता येणार नाही.
– हिमांशू