चला! एकदाचे व्यवहार सुरू झाले. दुकानं उघडली. नियम शिथिल झाले. घराबाहेर पडता येऊ लागलं. जे हवं ते खरेदी करता येऊ लागलं. ज्या गोष्टी खरंतर गरजेच्या नव्हत्या; पण आपणच आपल्या गरजा वाढवून ठेवल्या होत्या, असं जे तत्त्वज्ञान गेल्या दोन महिन्यात आपण सोशल मीडियावरून पाजळलं, त्या वस्तू पुन्हा एकदा “गरजेच्या’ म्हणून खरेदी करता येऊ लागल्या. “करोनानंतर जग बदलून जाणार, सगळं सगळं बदलणार,’ वगैरे भाकितांचं भवितव्य समजलं आणि जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत काहीच बदलत नसतं, हे वास्तव सगळ्यांनी नव्या खरेदीसोबत घरी आणलं…
ही परिस्थिती सामान्यतः निमशहरी भागातली आहे. महानगरांमध्ये अजून इतकी ढिलाई नाही; पण इतरत्र रुग्णसंख्या कमी म्हणून शिथिलता आणली गेली आणि लगोलग रुग्णसंख्या वाढू लागली. जिथं रोज दोन-तीन रुग्ण सापडत होते, तिथं अचानक वीस, पंचवीस, चाळीस रुग्ण सापडू लागले. लॉकडाऊनच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात जे लोक “रेड झोन’मध्ये अडकून पडले होते, ते चौथ्या टप्प्यात घरी परतू लागले. नेमका त्याच वेळी लोकांना लॉकडाऊन असह्य झाला आणि अनेक सवलती द्याव्या लागल्या. अनेक ठिकाणची स्थिती तर अशी आहे की, जी काळजी आता घ्यायला हवी, ती पहिल्या टप्प्यातच घेऊन झालीये आणि आता तसं जगण्याचा लोकांना अतोनात वैताग आलाय.
बाजारपेठा खुल्या होणार, याची चाहूल लागताच टीव्हीचा पडदा सवयीनं बदलून गेला. आता या पडद्यावर दिसणाऱ्या बहुतांश जाहिरातींना करोनाचा संदर्भ जोडला जाऊ लागलाय. इम्युनिटी वाढवणाऱ्या औषधांपासून जास्तीत जास्त जंतू मारणाऱ्या हॅंडवॉशपर्यंत आणि “लो टच डिलिव्हरी’ करणाऱ्या फूड चेनपासून पेस्ट कंट्रोलपर्यंत सगळीकडे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे करोनाचा विषाणू आहेच. पण वास्तवाचा विचार करायचा झाला, तर हा अदृश्य विषाणू अनेकांच्या अधिक जवळ आला असावा, अशी चिन्हं दिसतायत. जगाला रडवणारं हे कोडं सुटेपर्यंत आपण असणार की नसणार… अशी सुप्त भीती डोळ्यात घेऊन फिरणारे लोक बाजारपेठेत दिसतायत.
“सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा’ अशा हेडलाइन असोत किंवा “नियम पाळा, धोका टाळा’ असं प्रशासनाकडून वारंवार केलं जाणारं आवाहन असो, अनेक ठिकाणी गर्दीवर त्याचा शून्य प्रभाव जाणवतो. एकतर रस्त्यावर नेमकी केव्हा गर्दी असेल, हे घरातून निघताना कुणालाच माहीत नसतं. शिवाय प्रत्येकाला आपल्या गरजा महत्त्वाच्या वाटणं स्वाभाविकच! “प्रदूषण टाळलं पाहिजे, त्यासाठी वाहनांची संख्या कमी झाली पाहिजे; पण मी गाडी घेतल्यानंतर…’ असं प्रत्येकाला वाटतं तसंच हे आहे. परंतु भीती आणि गरजेच्या पलीकडचा एक भाव प्रत्येक चेहऱ्यावर दिसतोय- गोंधळलेपण!
विषाणूची साखळी तोडायची म्हणता-म्हणता घटनांची साखळी अशी काही गडबडून गेलीय, की आपल्याला विषाणू रोखायचाय की त्याच्याबरोबर जगायला शिकायचंय, हा सध्याचा खरा संभ्रम आहे. साखळी तोडायची म्हणून नियम पाळायचेत की साखळी तुटत नाही म्हणून रोगप्रतिकार शक्ती वाढवायचीय? की दोन्ही? रुग्णसंख्या वाढू नये म्हणून नियम कठोर करायचेत की अर्थव्यवस्था सावरायची म्हणून ते शिथिल करायचेत? की दोन्ही? नियमांची अंमलबजावणी करणारे संभ्रमात आहेत की नियम पाळणारे? की दोघेही?
– हिमांशू