अत्यावश्यक सेवा, अत्यावश्यक वस्तू हे सध्या परवलीचे शब्द बनलेत. काही दिवसांपूर्वी आपल्याच धुंदीत असलेले चंगळवादी लोक आता जगण्यासाठी “आवश्यक’ काय-काय आहे, याची गोळाबेरीज करतायत. पिझ्झा-बर्गरशिवाय ज्यांचं पान हललं नाही, ते पानात आलेल्या थालीपिठाचा मनमुराद आस्वाद घेतायत. सॉफ्ट ड्रिंक घेतलं नाही तर दिवस वाया गेला, असं समजणारे आता फ्रिजमध्ये ठेवलेल्या कलिंगडाच्या फोडीच कशा खराखुरा थंडावा देतात, याचा अनुभव घेतायत. “वॉन्ट’ आणि “नीड’ यातला फरक समजावून सांगणारे मेसेज सोशल मीडियावरून फिरतायत.
अशा प्रकारे सगळीकडे “जमिनीवर येण्या’ची प्रक्रिया सुरू असताना, ज्यांना जमिनीवर येण्याची सवयच नाही, ते मात्र कासावीस झालेत. ज्यांचा दिवसच मदिराप्राशनाने उगवतो आणि मावळतो, किंबहुना दिवस उगवणं आणि मावळणं यात ज्यांच्या दृष्टीने फारसा फरकच नसतो, ते तळीराम अतिशय अस्वस्थ आहेत.
“एकच प्याला’ नाटकातलं “मदिरा भक्त मंडळ’ जर खरोखर अस्तित्वात असतं तर लॉकडाऊनच्या काळात “दारूचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये करावा,’ या मागणीसाठी आंदोलन झालं असतं. मदिराभक्तांमध्ये अनेक प्रकार असतात. व्हाइट कॉलर मदिराभक्तांनी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात एकमेकांना फोन करून “स्टॉक आहे का,’ याची चौकशी केली. या प्रश्नाचं खरं उत्तर कुणीही कुणाला दिलं नाही आणि समोरचा खोटं बोलतोय हे माहीत असूनसुद्धा कुणी रागावलं नाही. “तोही आपल्यासारखाच’ म्हणून समजून घेतलं.
लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याबरोबरच मदिराभक्तांच्या अस्वस्थतेचाही पुढील टप्पा सुरू होतोय. आपली गरज किती तीव्र आहे, हे या तळीरामांनी सुरुवातीच्या टप्प्यातच दाखवून दिलंय. वाट बघून-बघून त्यांनी दारूची दुकानं फोडायला सुरुवात केली. मुंबईसह अनेक ठिकाणी असे चोरटे सीसीटीव्हीत दिसून आलेत. विशेष म्हणजे, सध्याच्या संकटकाळात डॉक्टर मंडळी जो नखशिखान्त पांढरा पोशाख घालतायत, तो चोरट्यांच्या अंगावर दिसला. या मंडळींनी तो कुठून मिळवला हे गूढच आहे. दुकानं फोडून “तहान’ भागत नाही म्हटल्यावर एके ठिकाणी तळीरामांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचं गोदामच फोडलं. अधिकाऱ्यांनी पकडलेले अवैध दारूचे असंख्य बॉक्स पळवले.
सगळीकडचा स्टॉक संपला तरी या गोदामात तो असणारच, याची तळीरामांना खात्री होती. दारूची दुकानं बंद असल्यामुळे या मंडळींची होत असलेली कुचंबणा लक्षात घेऊन अनेक ठिकाणी नवसागरवाल्यांनी स्पेशल भट्ट्या लावल्या आणि लॉकडाऊनच्या काळात अधिक कमाई करून “हिसाब बराबर’ करण्याचा प्रयत्न केला. अर्थात, अशी ठिकाणं कितीही आडभागात असली, तरी सापडल्यावाचून राहत नाहीत. अनिवार तलफ झालेल्यांचा पाठलाग करत पोलिसांनी ती शोधली आणि उद्ध्वस्त केली. तरीसुद्धा मदिराभक्तीमधील “शक्ती’ विचारात घेता, जागा बदलून-बदलून ती सुरूच राहतील, हे नक्की!
थोडक्यात, मर्यादित समूहासाठी का होईना, दारू “अत्यावश्यक’ असल्याचं पुन्हा अधोरेखित झालंय. केरळमध्ये तर डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आणलं तर दारू मिळू शकेल, असा काहीसा नियम केलाय म्हणे! पण सगळ्यात इंटरेस्टिंग स्टोरी हैदराबादचीच! “समदुःखी’ व्यक्तींची व्यथा ओळखून एका पठ्ठयानं आपल्या घरातल्या बाटल्या काढून “गरजूं’ना एकेक पेग दारू वाटली. दारू न मिळाल्यानं एका महिलेला फीट आली, हे बघवलं नाही म्हणून या “समाजसेवका’नं घरचा स्टॉक खुला केला. आता बोला!
– हिमांशू