– हिमांशू
करोनाच्या काळात मुलं ऑनलाइन शिक्षण घेताहेत. हळूहळू ही पद्धत त्यांच्या अंगवळणीही पडत चाललीय. (ज्यांना या पद्धतीबद्दल पुरेसं ज्ञान नाही, हातात गॅजेट नाही, मोबाइलमध्ये डाटा नाही किंवा परिसरात नेटवर्क नाही,
असे थोडेफार विद्यार्थी प्रवाहातून बाहेर फेकले गेले म्हणून काय बिघडलं?) नजीकच्या भविष्यात मुलांना सॉफ्टवेअरद्वारे शिक्षण दिलं जाण्याचा मार्ग यामुळे हळूहळू खुला होईल.
आकलनशक्ती वाढवणाऱ्या, विषय समजून सांगणाऱ्या सॉफ्टवेअर्सचा बाजार जाहिरातींनी सजलाच आहे आणि त्यामुळे काही दिवसांनी शाळांमध्ये शिक्षकांची गरजच भासणार नाही.
दुसरीकडे, बॅंकेची बहुतांश कामं आपण घरबसल्या करू लागलोच आहोत. भविष्यातल्या बॅंकासुद्धा “व्हर्च्युअल’ असतील, असं सांगितलं जातंय. बॅंकांना जिथं इमारतीचीच गरज असणार नाही, तिथं कर्मचाऱ्यांची गरज का असेल? गाड्यासुद्धा ड्रायव्हरविना धावू लागल्यात. अनेक कामं माणसाविना होऊ लागलीत.
काही वर्षांपूर्वी माणसाचं 26 टक्के काम यंत्रसामग्री करू लागली होती. काही वर्षांनंतर हे प्रमाण 52 टक्क्यांवर जाईल. सांगणारे सांगतात, या नव्या जगात नव्या स्वरूपाचा रोजगार निर्माण होईल आणि तो मिळवायचा असेल तर तांत्रिकदृष्ट्या स्वतःला अपडेट ठेवावंच लागेल.
जो मागे पडला तो सडला! परंतु जुन्या प्रकारचे किती रोजगार कायमस्वरूपी बाद होतील आणि नव्या स्वरूपाचे किती रोजगार निर्माण होतील, याचं गुणोत्तर मात्र ही मंडळी कधीच सांगत नाहीत.
खरं तर हीच आकडेवारी सर्वाधिक महत्त्वाची असते, हे कुणाच्या लक्षात येत नाही आणि आपण साप-साप म्हणून भुई धोपटत राहतो. याचं ताजं उदाहरण आहे रोबो प्रोसेस ऑटोमेशन म्हणजेच आरपीए तंत्रज्ञान. काही वर्षांपूर्वी “आयटी’ क्षेत्राची भरभराट सुरू झाली. “आयटी’ कंपनीत नोकरी मिळणं भाग्याचं मानलं जाऊ लागलं.
जागोजागी आयटी पार्क उभे राहिले आणि या क्षेत्रात काम करणाऱ्यांचं जणू एक स्वतंत्र विश्वच निर्माण झालं. सर्वसाधारण जॉब करणाऱ्यांच्या दृष्टीनं या क्षेत्राचा झगमगाट म्हणजे दृष्टीआडची सृष्टी! परंतु कालांतरानं या क्षेत्रातल्या मंडळींवर “अपडेट व्हा नाहीतर जॉब गमवा,’ अशी स्थिती ओढवली. कारण तंत्रज्ञान वेगानं बदलत गेलं.
जुन्या ज्ञानाचा उपयोग होईनासा झाला. यातलाच पुढचा टप्पा आहे आरपीए. या तंत्रज्ञानामुळे भारताच्या आयटी क्षेत्रातल्या तब्बल 30 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या 2022 पर्यंत जातील, असं भाकित बॅंक ऑफ अमेरिकाच्या अहवालात वर्तवलंय. कर्मचारी जसं काम करतात, तसंच हुबेहूब काम आरपीए तंत्रज्ञान करणार आहे.
एकट्या या तंत्रज्ञानामुळे 7 लाख जणांच्या तर अन्य तांत्रिक बदलांमुळे इतरांच्या नोकऱ्या जातील, असं बॅंकेनं अहवालात म्हटलंय. या बदलांमुळे आयटी कंपन्यांची शंभर अब्ज डॉलर इतकी भरभक्कम बचत होणार आहे. कंपन्यांची बचत होणार म्हणजे अर्थातच कंपन्यांचा नफा वाढणार.
नव्या प्रकारचं तंत्रज्ञान आल्यामुळे नव्या प्रकारचे रोजगार निर्माण होतात, हे गृहित धरल्यास आरपीएमुळे किती रोजगार निर्माण होणार, याचा आकडेवारीनिशी उल्लेख कुठेही आढळत नाही. किती नोकऱ्या जाणार आणि त्यामुळे कंपनीचे किती पैसे वाचणार, हे मात्र ठळकपणे दिसतं.
ज्याअर्थी नोकऱ्या जाण्याच्या प्रक्रियेत “बचत’ दिसतेय, त्याअर्थी “जॉबलेस ग्रोथ’चा आक्षेप योग्यच म्हटला पाहिजे. आक्षेप तंत्रज्ञान वाढण्याला नाही; माणूस संपण्याला आहे.