हिमांशू
एखाद्या संकटाविषयी कुणालाच काही कळत नाही आणि बोलल्याशिवाय कुणी राहत नाही, अशा वेळी ते संकट अंगावर कोसळलेलं अधिक चांगलं; पण ही बडबड नको असं वाटायला लागतं. करोनाच्या विश्वव्यापी संकटाच्या बाबतीत किमान आपल्या देशात तरी हीच परिस्थिती आहे. करोना हा आजारच नाही तर तो कंपन्यांचा आंतरराष्ट्रीय कट आहे, असं सांगणाऱ्यांपासून तो “विशिष्ट’ लोकांनाच होतो अशा भंपक वक्तव्यांपर्यंत अनेक दिवे पाजळले गेलेत.
करोनाच्या विषाणूची कथित जन्मकथा तर चार-पाच वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या कानावर आलीय. कुणी म्हणालं, हा विषाणू वटवाघळातून आला तर कुणी म्हणालं, प्रयोगशाळेत तयार केला. तो या पृथ्वीवरून नष्ट होत चाललेल्या प्राण्यांच्या शरीरातला विषाणू असावा आणि संबंधित प्राणी नामशेष झाल्यामुळे त्यानं मानवी देह “नवा होस्ट’ म्हणून निवडला असावा, अशीही एक थिअरी मांडली गेली. परंतु थिअरी मांडण्याच्या बाबतीत आणि उपाययोजना सुचवण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात (सॉरी, तोंड!) जगात कुणी धरू शकत नाही.
करोनाच्या विषाणूमध्ये जे उत्परिवर्तन झालंय, त्याच्या बाबतीत अशीच एक फॅन्टास्टिक थिअरी मांडली गेलीय. मांडणारे अर्थातच भाजपचे नेते आहेत. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी ही लाखमोलाची थिअरी आपल्याला दिलीय. ते म्हणतात, की आपण त्याला (विषाणूला) संपवण्याची तयारी करीत आहोत म्हणून तो सतत रूप बदलतोय.
मुळात “करोनाचा विषाणू हासुद्धा एक जीव आहे आणि त्यालाही जगण्याचा अधिकार आहे,’ हा रावत यांच्या बहुमोल थिअरीचा पाया आहे. तसं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंयसुद्धा! “आपण मानव स्वतःला बुद्धिमान समजतो आणि विषाणूला संपवायची तयारी करतो, म्हणून तो रूप बदलतो,’ असं त्यांचं म्हणणं आहे. त्यात बरंच तथ्यही आहे.
“करोनाला हरवायचंय’पेक्षा “करोनापासून बचाव करायचाय,’ ही भाषा केव्हाही अधिक प्रॅक्टिकल ठरेल. मानव स्वतःला बुद्धिमान समजतो, हेही बरोबरच! कारण विषाणू आपल्यापेक्षा हुशार आहे हे स्पष्ट झालंय. पण रावत यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला तो एकाच वक्तव्यामुळे…. ते म्हणजे, करोनाच्या विषाणूला जगण्याचा अधिकार आहे. नशीब, हा विषाणू आपल्याला न दिसण्याइतका लहान आहे.
मलेरिया पसरवणारी ऍनाफेलिस डासाची मादी आणि प्लेगचे उंदीर याबाबत माजी मुख्यमंत्र्यांचं मत काय आहे, हे एकदा जाणून घेतलं पाहिजे. कारण तेही जीवच आहेत आणि त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. नेटकरी रावत यांची खिल्ली उडवणार, हे या विधानानंतर निश्चित होतं. काहीजणांनी केंद्राच्या “सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पात करोना विषाणूला आसरा द्यावा, असा टोमणा हाणला तर एक पठ्ठ्या म्हणाला, करोना प्राणी आहे तर त्याला आधारकार्ड, रेशनकार्ड द्या!
“मानवानं सुरक्षित राहण्यासाठी करोना विषाणूच्या पुढे जायला हवं,’ या रावत यांच्या वाक्याचा अर्थ जेव्हा समजेल, तेव्हाच त्यावर बोलणं इष्ट! कारण विषाणूलाही जीव आहे आणि त्याला जगण्याचा अधिकारसुद्धा आहे, ही भूतदया समजू शकते; पण त्याच्या पुढे जायचं म्हणजे नक्की काय करायचं, हे कसं कळणार? सीसीटीव्ही असतानासुद्धा बेधडक चोऱ्या करणारे जसे तंत्रज्ञानाच्या पुढे गेलेले असतात, तसं आपण विषाणूच्या पुढे जायचं का? नेमकं काय करावं लागेल त्यासाठी?