हिमांशू
आम्हाला कुणी हसलं तरी चालेल; पण कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की आम्ही बेहद्द खूश असतो हे उघडपणे सांगण्यास आम्हास अजिबात लाज वाटत नाही! एक तर आम्ही सोशल मीडियावर फारसे रमू शकलो नाही. ट्रोल करणं आणि होणं या दोन्ही “एन्जॉय’ करण्याच्या बाबी आहेत, हे तत्त्वज्ञान आमच्या गळी उतरलंच नाही. शिवाय सोशल मीडियावर आपण तेच ते पुनःपुन्हा करतोय असा फील येतो. निवडणुका जवळ आल्या की सोशल मीडियाचा नूरही इतर माध्यमांसारखाच बदलून जातो.
नवनवीन शाब्दिक आयुधं, एकमेकांना घायाळ करणं, घायाळ होऊनसुद्धा शस्त्रं फिरवत राहणं असा सगळा रसरशीत मामला असतो. कुठेच शिळेपणा दिसत नाही. रोज नवे आरोप; रोज नवीन प्रत्यारोप. अशा वेळी नेत्यांच्या (आणि अर्थातच स्क्रिप्ट राइटर्सच्या) प्रतिभा फुलून जातात. त्यातच कुणी ना कुणी रोज मर्यादा वगैरे सोडून बोलतोच. मर्यादा आपणच ठरवल्या हो! समजणाऱ्याला “त’वरून “ताकभात’ समजतो. बोलून दाखवलं की टीका होते एवढंच!
अर्थात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा विचार करता, एवढे धामधुमीचे दिवस अजून आलेले नाहीत. यंदा जाहीर सभांना परवानगी मिळते की नाही कुणास ठाऊक! म्हणजे हिरमोड होण्याची चिन्हं! सभांची तहान ट्विटरवर भागवावी लागणार. तरी सध्या इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येणाऱ्या-जाणाऱ्यांची गंमत पाहायला मिळतेच आहे.
उमेदवारी मिळाली नाही किंवा मिळणार नाही याची खात्री आहे, अशा वेळी नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारायला सुरुवात करतात. उत्तर प्रदेशात ज्या उड्या दिसतायत, तो याचाच परिणाम मानला जातोय. या स्वार्थाच्या पार्श्वभूमीवर एका पक्षाच्या “त्या’ उमेदवाराबद्दल ऐकून खरंच गलबलून आलं. आता या बिच्चाऱ्याला उमेदवार तरी कसं म्हणावं? उमेदवारी तर मिळालीच नाही. म्हणूनच ह्याचं नाव “बिच्चारा’! अगदी ओठांवर भरघोस मिशा असल्या तरी लहान मुलासारखा निरागस.
अशा चेहऱ्याचा माणूस भोकाड पसरून रडताना कसा दिसला असेल, याची कल्पनाही करवत नाही. पण निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही म्हणून इतरांसारखा पक्ष नाही बदलला महाशयांनी! “”बघा ना, मला तिकीट देणार असं पक्कं सांगितलं होतं. मी मतदारसंघात होर्डिंगसुद्धा लावली होती आणि आता अचानक तिकीट नाही म्हणतायत…” असं म्हणून त्यांनी गळा काढला. माध्यमांचे कॅमेरे सुरू आहेत, हे पाहून सोबतच्या लोकांनी “”आप परेशान मत होईए” अशा शब्दांत समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
एखाद्या हताश पित्यानं मुलाला हवी असलेली वस्तू “”पुढच्या महिन्यात आणू हं,” म्हणावं तसंच हे वाटलं. थोडा वेळ रडून श्रीयुत बिच्चारे यांनी त्याच चेहऱ्यानं पत्रकारांना नमस्कार केला. कित्ती इनोसंट! सगळीकडे स्वार्थ दिसत असताना कुठे असा भाबडेपणा दिसला, की बरं वाटतं. निवडणूक लढवणं, जिंकणं, जिंकल्यानंतर छाती फुगवणं वगैरे चालणारच;
पण हरण्यासाठी उभा राहणारा उमेदवार दिसला तर काय करायचं? उत्तर प्रदेशात असाही एक बहाद्दर आहे, ज्याला “हरण्याचा विक्रम’ करायचाय. 93 वेळा पराभूत झालेला हा उमेदवार यावेळीही अर्ज भरतोय. त्याला म्हणे पराभवांचं शतक साजरं करायचंय. श्रीयुत बिच्चारे यांच्याबरोबरच या विक्रमादित्यालाही तोफांची सलामी द्यावीशी वाटते!