-हिमांशू
चला, एक गेम खेळूया. पूर्वीपासून चाललाच आहे; पण आता हाच कंटिन्यू करूया. “तुम अगर एक मारोगे तो हम चार मारेंगे,’ हे ब्रिदवाक्य घेऊनच यापुढं वाटचाल करूया. सुदैवानं आपण दोघं एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहोतच. (शत्रू म्हणायला नको; नाहीतर पुढे पंचाईत होईल.) दोघांच्याही हाती सत्ता आहे आणि सत्तेचा गैरवापर करणारेही सगळीकडेच असल्यामुळे सगळ्यांचेच हात दगडाखाली आहेत.
सगळ्यांचेच हात बरबटलेले आहेत, तरी दोघांच्याही हातात वेगवेगळ्या तपासयंत्रणा आहेत. त्यांनी ज्यांचा तपास करणं अपेक्षित आहे, त्यांना दोघे मिळून अभय देऊया आणि तुम्ही आमचे, आम्ही तुमचे असे एकमेकांचे भिडू टिपूया. दोघांनाही एकमेकांची खडान्खडा माहिती आहे, कारण हमाम में तो सभी… लोक आजारानं ग्रासलेत, तर ग्रासूदे! पाऊस हवा तेव्हा दडी मारून आणि नको तेव्हा पडून शेतीचं वाटोळं करतोय, करूदे! कारखाने बंद पडल्यामुळे अनेकांची कामं गेलीयेत, जाऊदे!
असंख्य मध्यमवर्गीयांनाही नोकरीवरून डच्चू मिळालाय, मिळूदे! काहींना अर्धाच पगार मिळतोय आणि काहीजण बिनपगारी राबतायत, राबूदे! खरं तर हे सगळं असंच असूदे! कारण त्याशिवाय सर्वसामान्य माणसं आपल्याकडे पाहणार नाहीत. लोकांना अशाळभूत बनवल्याखेरीज आपल्याभोवती गर्दी होत नाही. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळू; पण गर्दी जमवूच. तुमच्याभोवती अधिक माणसं की आमच्याभोवती, एवढंच पाहायचंय. चढाओढ सुरूच ठेवू… पुढच्या निवडणुकीपर्यंत!
कुणालाच काही करता येत नाही, असं वातावरण निर्माण झालंय. तिजोरीत पैसा नाही. ना राज्याच्या, ना केंद्राच्या. मग नसते उपद्व्याप सांगितलेत कुणी? जोपर्यंत घोषणांवर भागतंय तोपर्यंत भागवू… लोक जास्तच वळवळ करायला लागले तर एकमेकांना ट्विटरवरून शिव्या देऊ. त्याच्या बातम्या बनवू. रंगांवरून आणि ढंगांवरूनही भांडू एकमेकांशी.
सोशल मीडिया कशासाठी आहे? लोकांना सांगू… ब्लॅक किंवा व्हाइट, कोणतातरी एकच रंग निवडा. तिसरा रंगच दिसता कामा नये लोकांना..! मग आपण आपापल्या टीम निवडू. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले चढवायला लागू. बिघडू दे भाषा बिघडली तर. नाहीतरी भाषेची फिकीर राहिलीये कुणाला! वातावरण सतत गरम राहिलं पाहिजे. तर आणि तरच आपल्या दोघांचाही बचाव शक्य आहे.
ही माणसं आपल्या अंगावर येता कामा नयेत. दोन भाग पाडले म्हणजे ते आपसात भिडतात. आपल्याला नडत नाहीत. तुमच्या माणसांना आमचं काहीही चांगलं वाटता कामा नये. आमच्या माणसांना तुमच्याविषयी तसंच वाटेल याची काळजी आम्ही घेतोच आहोत. कितीही मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला तरी एकमेकांकडे बोटं रोखली जातील अशी तजवीज करू; कारण प्रॉब्लेम सोडवण्याची धमक आता ना तुमच्यात आहे, ना आमच्यात!
आता नुसत्या शब्दांवर भागत नाहीये. थेट काहीतरी करून दाखवावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आमचे दोनजण उचला. आम्ही तुमचे दोनजण उचलू. चौकशी किती तास चालली? अजून किती रात्री लॉकअपमध्ये काढाव्या लागणार? लॉकअपमध्ये संबंधितानं जेवण केलं की नाही? संबंधिताने काय खाल्लं? घरचा डबा मिळाला का? संबंधिताचे डोळे भरून आले का? अशा प्रश्नांची उत्तरं ऐकायला लोकांना आवडतं. मुख्य म्हणजे, या उत्तरांमध्ये लोक त्यांचे प्रश्नच विसरतात. म्हणूनच म्हटलं, चालूद्या गेम!