-हिमांशू
झाली एकदाची उलथापालथीला सुरुवात! मस्त गोंधळाचं वातावरण. किती गेले, किती उरले, किती जाणार, काय होणार, याचा हिशेब आणि न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधींची कॅमेरामनसह आणि बूमसह इकडून तिकडे धावाधाव सुरू झाली. आता कसं खुल्या वातावरणात श्वास घेतल्यासारखं वाटतंय. सगळीकडे विशेषतः राजकारणात सगळं काही शांत, सुरळीत चाललेलं असलं की हल्ली कंटाळाच येतो. अगदी श्वास गुदमरल्यासारखं वाटतं. नीरसपणाचा उबग येतो. सलग चार दिवस बटाट्याची भाजी खावी लागली तर जशी चिडचीड होते ना, तसं वाटतं या राजकारण्यांकडे पाहून!
चव यावी असं काही घडतच नाहीत. दिवसेंदिवस, महिनोन्महिने शांत बसून राहतात. यासाठी का निवडून दिलेलं असतं आम्ही त्यांना? कामावरून दमून-भागून घरी यावं, न्यूज चॅनेल लावावं आणि टीव्हीच्या पडद्यावर तितक्याच रूंद चेहऱ्याचा किम जोंग उन दिसावा, यासाठी का आम्ही केबलवाल्याला पैसे देतो? उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचा विक्षिप्त दिनक्रम आम्ही किती दिवस बघायचा? देशातच काहीतरी खळबळजनक घडायला नको का? बरं झालं, आता देशाच्या मध्यभागी असलेल्या मध्य प्रदेशातूनच सुरुवात झाली. अशी पळापळ व्हायला पाहिजे. चकचकीत मोटारी इकडून तिकडे सुसाट धावल्या पाहिजेत. टीव्हीवाल्यांनी त्या मोटारींचा पाठलाग केला पाहिजे. “मध्य प्रदेशातलं वादळ राजस्थानात पोहोचणार?’ अशा प्रश्नचिन्हांकित शक्यता वर्तवून वातावरणात थ्रिल निर्माण केलं पाहिजे. रात्रभर टीव्ही पाहता आला पाहिजे.
मध्य प्रदेशात जे घडलं ते सोमवारी रात्रीच घडलं; पण आम्ही बेसावध असल्यामुळे मंगळवारची सकाळ उजाडेपर्यंतचा पिक्चर बुडला. आता मात्र पुढं लक्ष ठेवलं पाहिजे. पत्रकार परिषदा आणि त्यातले आरोप-प्रत्यारोप दिवसा पाहायला मिळतातच; पण खरी गंमत रात्रीच घडते. बॅंकांचा प्रॉब्लेम वगैरे विसरा हो आता! किती लोकांचे पैसे बुडणार आणि शेअर मार्केटमध्ये काय घडलं, यापेक्षा कुणी कुणाचं पेन्टिंग किती रुपयांना विकत घेतलं, हा खरा प्रश्न आहे. कुणाचे कुणाशी लागेबांधे आहेत, यावर गरमागरम चर्चा झडणं महत्त्वाचं. इकडून कुणीतरी गंभीर आरोप करतो. मग कुणीतरी बॅंकेच्या कर्जाची 2014ची आणि 2019ची आकडेवारी आणून तिकडची बाजू लावून धरतो. त्या निमित्तानं पैसे घेऊन परदेशी पळालेल्या सगळ्यांची नावं निघतात. ती कुणाकुणाच्या नावांशी जोडली जातात. मग स्पष्टीकरणं येतात. जाम मजा येते. पैसे बुडले तरी बेहत्तर; पण असे दिलखेचक “एपिसोड’ बुडता कामा नयेत. करोना वगैरेचं काय कौतुक सांगता राव? त्या विषाणूपेक्षा अधिक वेगानं राजकीय बातम्या व्हायरल करून पाहा एकदा रात्री-अपरात्री. कौतुक होईल तुमच्या सजगपणाचं! मरण यायचंच असेल तर कसंही येईलच. त्यासाठी करोनाचा एवढा डिमडिम कशाला?
जीवनात थ्रिल पाहिजे; वेग पाहिजे. इतका वेग पाहिजे, की काल घडलेलं आज आणि तासाभरापूर्वी घडलेलं आत्ता शिळं झालं पाहिजे. कशातच गुंतून पडायचं नाही. कशातच जीव अडकवून ठेवायचा नाही. जे गेलं ते नियतीचं… जे येईल ते गमतीचं! मध्य प्रदेशमध्ये असा “बिग बॅंग’ झालाय की आठवडाभर तरी रोज नवंनवं घडत राहील. क्षणाक्षणाला चित्र बदलत राहील. आपल्या जुन्या जखमांवर फुंकर घातली जाईल. नव्या जखमांसाठी ठणठणीत होऊ आपण!