मुंबई – भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्तास्थापन करण्यात अपयशी झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाशिवआघाडीसाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज आमदारांसोबत बैठक पार पडली.
महाराष्ट्रात सध्या राजकीय अस्थिरतेचे चित्र असल्याने मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, शरद पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. ते म्हणाले, आमदारांनी चिंता करू नये. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार नसल्याचे सांगितले आहे.
तसेच शरद पवार पुढे म्हणाले कि, आमदारांनी आपल्या मतदारसंघात जाऊन काम करावे. अवकाळी पावसांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे. तसेच ज्या मतदारसंघातून निवडणूक जिंकली त्याठिकाणी जाऊन आभार दौरे करावे, असा सल्ला पवारांनी आमदारांना दिला.
दरम्यान, राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना सर्वाधिकार देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी दिली.