नवी दिल्ली – देशात सरकारच्या विरोधात आंदोलने करणाऱ्या किंवा सोशल मीडियामध्ये पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तींची सर्रास युएपीए कायद्या अंतर्गत धरपकड सुरू असून त्यामुळे संपुर्ण देशात दहशतीचा माहोल तयार केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सतत केला जात आहे.
या कायद्या अंतर्गत आत्तापर्यंत नेमक्या किती लोकांवर कारवाई करण्यात आली असा प्रश्न विरोधकांकडून संसदेतही उपस्थित करण्यात आला आहे. त्याला आज राज्यसभेत उत्तर देताना गृहराज्यमंत्री जी. के. रेड्डी यांनी सांगितले की सरकारने 2016 पासून 2019 या अवधीत एकूण 5 हजार 922 लोकांवर युएपीए म्हणजेच अनलॉफूल ऍक्टीव्हीटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आली आहे.
याच अवधीत 132 लोकांची यातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. सरकारने सोशल मीडियावरील एका पोस्टला आक्षेप घेऊन कॉंग्रेस नेते शशी थरूर आणि सहा ज्येष्ठ पत्रकारांवरही युएपीए कायद्यान्वये गुन्हे दाखल केल्याने त्याच्या विरोधात देशभर ओरड सुरू झाली आहे.