पाटणा: बिहारमध्ये हजारोंच्या संख्येने स्थलांतरित मजूर परत येत असून त्या मजुरांचे रजिस्ट्रेशन करून त्यांना क्वारंटाइन करण्याची सक्ती आता बिहार सरकारने रद्द केली आहे. देशभर आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने स्थलांतरित मजुरांच्या हालचाली सुकर व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत त्या राज्यात 8 लाख 77 हजार मजुरांना चौदा दिवसांचा क्वारंटाईन अवधी पूर्ण केल्यानंतर सोडून देण्यात आले असून अद्याप पाच लाख 30 हजार मजूर क्वारंटाईन सेंटरमध्ये आहेत. आता सोमवारपासून ही सारी प्रक्रिया थांबवण्यात आल्याने बिहारी मजुरांना कोणत्याही अडथळ्याविना आपल्या गावी परतणे सोपे होणार आहे. या संबंधात माहिती देताना राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव प्रत्यया अमृत यांनी सांगितले की आता रेल्वे व बस वाहतूक सुरळीत झाल्याने कोणीही प्रवासी बिहारमध्ये येऊ शकतो. त्यातील नेमके स्थलांतरित मजूर कोण हे शोधणे जिकिरीचे झाल्याने ही प्रक्रियाच आता रद्द करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या काळात लोकांना एका राज्यांतून दुसऱ्या राज्यांत जाण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून अनुमती घ्यावी लागत होती. आता अनलॉक 1 मध्ये या अनुमतीचीही गरज काढून टाकण्यात आली आहे. स्थलांतरित मजुरांच्या शेवटच्या बॅचची चौदा दिवसांच्या क्वारंटाइनची मुदत संपल्यानंतर 15 जूनपासून राज्यातील क्वारंटाइन सेंटर्सही बंद केली जातील, असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत 28 ते 29 लाख स्थलांतरित बिहारमध्ये परतले आहेत. हे एक मोठे स्थलांतर मानले जात आहे.