मुंबई – केंद्रातील मोदी सरकारने इंधन दरात कपात करून जनतेला दिलासा दिल्याचे ढोल वाजवत आहेत. प्रत्यक्षात ही कर कपात व भाजप नेते करत असलेले दावे जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणारे आहेत, असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच मोदी सरकार खरेच इमानदार असेल तर त्यांनी 2014 सालापासून इंधनावर वाढवलेले अन्याकारक कर रद्द करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
नाना पटोले म्हणाले, मोदी सरकारने पाच महिन्यांपूर्वी पेट्रोल 10 रुपये व डिझेल 5 रुपयांनी कमी केले आणि नंतर पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच पुन्हा दर वाढवून होते, तेवढेच दर केले. आता राज्य सरकारने कर कपात करावी, अशी मागणी करत राज्यातील भाजप नेते चुकीची व दिशाभूल करणारी विधाने करत आहेत. मूल्यवर्धित कर असल्याने केंद्र सरकारने किमती कमी करताच तो आपोआप कमी होतो, एवढे सामान्यज्ञान भाजप नेत्यांकडे नाही.
केंद्राने कमी केलेल्या प्रत्येक एक रुपयात 41 पैसे राज्याच्या हिस्स्याचे आहेत. म्हणजे पेट्रोलच्या 9.5 रुपयातील जवळपास 4 रुपये राज्याचे आहेत. डिझेलच्या 7 रुपये दर कपातीतील जवळपास 3 रुपये राज्य सरकारच्या हिस्स्याचे आहेत. मोदी सरकार इंधनावर रोड डेव्हलपमेंट, कृषी विकास सारखे वेगवेगळे सेस लावून लूट करत आहेत.
अबकारी करातील हिस्सा राज्याला मिळतो पण सेसमधला हिस्सा राज्याला मिळत नाही. एक प्रकारे अबकारी कर कमी करून केंद्र सरकार राज्याची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसरीकडे सेस लावून जनतेची लूट करत आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.