नवी दिल्ली – भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा इतर सर्व गोलंदाजांपेक्षा वेगळा आहे. जर कसोटीत टिकून राहिल्यास 400पेक्षा अधिक विकेट्स घेण्याची त्याच्यात क्षमता आहे, असा विश्वास वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज कर्टली ऍम्ब्रोस यांनी व्यक्त केला आहे. वेस्ट इंडिजसह जगातील महान गोलंदाजांमध्ये ऍब्रोसचा समावेश आहे.
एका यूट्यूब कार्यक्रमात बोलताना ऍम्ब्रोसने बुमराहची तोंड भरून प्रशंसा केली. ऍब्रोस म्हणाला, भारताकडे काही चांगले गोलंदाज आहेत. त्यामध्ये बुमराह हा खूपच खास आहे. मी स्वतः त्याचा चाहता आहे. मी पाहिलेल्या कोणत्याही गोलंदाजापेक्षा तो खूपच वेगळा आहे. तो अत्यंत प्रभावशाली गोलंदाज आहे. त्याने आगामी काळात आणखी चांगली कामगिरी करावी असे मला वाटते, असे त्याने सांगितले.
वेस्ट इंडिजच्या माजी फास्ट बॉलर्सला बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी “तो फिट असेपर्यंतच क्रिकेट खेळू शकेल. बॉल चांगला स्विंग करेल आणि प्रभावी यॉर्कर टाकेल. त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे. तो जास्त काळ खेळल्यास सहज 400 विकेट्सचा टप्पा पूर्ण करेल, अशी मला खात्री आहे, असे ऍम्ब्रोस म्हणाला.
बुमराहचा रन अप छोटा असल्याने त्याचा शरिरावर जास्त ताण येतो. तो स्वत:ला जितकं फिट ठेवेल तितकं त्याचं करियर दीर्घ काळ असेल. वेगवान गोलंदाजांसाठी तो लयमध्ये असणे आवश्यक असते. बुमराह फिट राहिला तर त्याला जास्त काळ कसोटी क्रिकेट खेळण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्याने सांगितले.
दरम्यान, बुमराहने 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो आजवर 19 कसोटी सामने खेळला असून त्याने 22.10च्या सरासरीने 83 विकेट्स घेतल्या आहेत. एका कसोटीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी त्याने पाच वेळा केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 400 पेक्षा विकेट्स घेण्याची कामगिरी आजवर 10 गोलंदाजांनी केली आहे. यात ऍम्ब्रोसने 12 वर्षांच्या कारकिर्दीत 98 कसोटी सामन्यांमध्ये 405 विकेट्स घेतल्या आहेत.
सलामीची भागीदारी निर्णायक ठरणार
पुढील महिन्यात साऊथॅम्प्टन येथे 18 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा न्यूझीलंडशी सामना होणार आहे. या सामन्यात सलामीची भागीदारी निर्णायक ठरणार असल्याचे मत ऍम्ब्रोजने व्यक्त केले. सलामीवीर फलंदाजांनी पायाभूत कामगिरी करणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे सलामीवीरांकडून चांगली सुरूवात झाल्यास मधल्या फळीत फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यास मदत होईल आणि संघ चांगली कामगिरी करू शकेल, ऍम्ब्रोस म्हणाला.