कोलकाता – दुर्गा पुजा समितींना नवरात्रीच्या काळात 50 हजार रूपयांची मदत करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारने घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावर उलट सुलट चर्चा सुरू आहेत. उच्च न्यायालयानेही यावर भाष्य केले आहे. अन्य धर्मियांच्या सणांनाही अशीच मदत करणार का, अशा आशयाचा प्रश्न न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला विचारला आहे.
चर्चा होत असताना आता एका अनपेक्षित वर्तुळातून ममता सरकारच्या या निर्णयाला पाठबळ मिळाले आहे. नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. करोनाच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून ही मदत देण्याचा निर्णय योग्यच असल्याचे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या संदर्भात उपाययोजना करताना दुर्गा पुजा समितींना अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे सरकारचा हा निर्णय योग्य असल्याचे बॅनर्जी यांनी नमूद केले.
समितींनी मास्क, सॅनिटायझर आदींवरच सरकारने केलेली मदत खर्च करावी. मनोरंजनाच्या बाबींवर खर्च करू नये असे न्यायालयानेही बजावले आहे. तर भाविकांना मंडपात प्रवेश दिला जाणार नसल्याचेही जाहीर केले आहे. आयोजन समितीच्या मोजक्या सदस्यांना प्रवेश दिला जावा असे निर्देश देण्यात आले आहेत.