वाहतूक विस्कळीत ; ठेकेदाराला घेराव
कराड – अभयचीवाडी येथे गावकऱ्यांनी केला रस्ता रोको दोन कराड पाटण रस्ता बंद वाहतूक विस्कळीत धुळीचा त्रास अनेक महिन्यापासून सुरू आहे. ठेकेदाराला लोकांनी घेराव घातला एल अँण्ड टी कंपनी चे प्रोजेक्टर शिंदे यांनी 20दिवसात काम करू आश्वासन दिले त्यावेळी रस्ता मोकळा केला.
विजापूर-गुहागर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात उकराउकरी केली आहे. यामुळे रस्त्यावर असणाऱ्या गावातील लोकांना धुळीचा मोठा त्रास होत आहे. यातच रस्त्यावर सुरक्षा म्हणून ठेकेदाराने काही सोय केली नाही. साधे रिफ्लेक्टरही बसवले नाहीत. अभयचीवाडी येथे अनेक महिन्यापासून रस्ता नुकताच उकरून ठेवला आहे. रस्त्याकडे कसलीच सुरक्षा नसल्याने अपघात होत आहे. लोकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजार होत आहेत. रस्त्याच्या कडेला घरे असल्याने जेवणातही धूळ येत आहे. दोन महिन्यापूर्वी मालगाडीचा अपघात झाला होता. तर गतवर्षी याच रस्त्यावरील दुचाकी अपघातात तांबवे येथील एक महिला मयत झाली होती. तरीही संबंधित ठेकेदाराचे डोळे उघडलेले नाहीत. यासंदर्भात गेल्या महिन्यात म्होप्रेकरांनी रस्ता रोको केला होता.
म्होप्रे, वसंतगड, साकुर्डी, सुपने, तांबवे फाटा, विहे रस्त्यावरील गावातील लोकांना नाहक या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कामामुळे उडणाऱ्या धुळीला आणि त्यामुळे तेथील ग्रामस्थांना आणि वाहनधारकांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून अभयचीवाडी, सुपने, म्होप्रे, साकुर्डी, वसंतगडकर अक्षरशः वैतागले आहेत. सदरच्या रस्त्याचे कामाकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले असून आठवडाभरात योग्य ती कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करून रस्त्याचे काम बंद करण्याचा इशाराही अभयचीवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.
अभयचीवाडी येथे रास्ता रोको केल्यानंतर रस्त्याचे एल अँण्ड टी कंपनीचे प्रोजेक्ट इनचार्ज शशांक व शिंदे हे उपस्थित होताच त्यांना लोकांनी घेराव घातला. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा तरच रस्ता मोकळा करू असे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी शिंदे यांनी रस्ता लवकर पूर्ण करू असे आश्वासन दिले. मात्र ग्रामस्थांनी सदरच्या रस्त्याचे काम 20 दिवसांत पूर्ण करा, अन्यथा काम बंद पाडण्याचा इशारा दिला.