1 लाख 12 हजार थकबाकीदारांनी घेतला योजनेचा लाभ
करोना काळातही मिळाले तब्बल 354 कोटींचे उत्पन्न
पुणे – गेल्या आठ महिन्यांपासून करोनामुळे आर्थिक उत्पन्नाचा ताळमेळ ढासळलेल्या महापालिकेस मिळकतकर थकबाकीदारांच्या अभय योजनेमुळे दिलासा मिळाला. यातून तब्बल 354 कोटींचा महसूल मिळाला आहे. योजनेचा मागील दोन महिन्यांत सुमारे 1 लाख 12 हजार 110 मिळकतधारकांनी लाभ घेतला असून पुढील आर्थिक वर्षापासून हे नियमित मिळकतधारक होणार आहेत. त्यामुळे पालिकेस पुढील वर्षापासून सुमारे 300 कोटींचे उत्पन्न वाढणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि कर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.
महापालिकेची मिळकतकर थकबाकी सुमारे साडेपाच हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे. कर न भरणाऱ्या मिळकतकरावर प्रतिमाह 2 टक्के दंड आकारला जातो. त्यामुळी दरवर्षी ही थकबाकी फुगतच असून कर न भरणारे सुमारे साडेतीन लाख थकबाकीदार आहेत. त्यातील अनेक थकबाकीदार नियमित कर भरण्यास तयार असले तरी त्यांच्याकडून दंडाच्या रकमेत सूट देण्याची मागणी केली होती.
त्यामुळे, प्रशासनाकडून या थकाबाकीदारांसाठी अभय योजना प्रस्तावित केली. 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी ही योजना होती. याच्या शेवटच्या दिवशी सुमारे 32 कोटी 60 लाख रुपयांचा कर थकबाकीदारांनी जमा केला.
त्यामुळे या योजनेत मिळालेल्या उत्पन्नाने महापालिकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत तब्बल 1205 कोटींचे उत्पन्न मिळविले आहे. तर, मागील वर्षात सर्वसामान्य स्थिती असतानाही पालिकेस अवघे 1006 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. परिणामी अभय योजना पालिकेसाठी आर्थिक दिलासा देणारी ठरली आहे.
अभय योजनेला मुदतवाढ
अभय योजनेतून पालिकेस तब्बल 354 कोटींचे उत्पन्न मिळाल्याने या योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची मुदत 30 नोव्हेंबर रोजी संपली आहे. मात्र, शहरात पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता असल्याने या योजनेस मुदतवाढ देता आली नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात स्थायी समितीत या मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली.
दरम्यान, या योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी महापालिकेच्या 50 हून अधिक नगरसेवकांनी केली आहे. तसेच, पालिकेस करोनाकाळातही थकबाकीचे उत्पन्न मिळत असल्याने या मागणीचा रास्त विचार करणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी स्पष्ट केले. मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी पालिकेने दि. 2 ऑक्टोबरपासून “अभय’ योजना लागू केली. याअंतर्गत 50 लाखांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या करदात्यांना मिळकतकरावर आकारलेल्या दंडाच्या रकमेत 80 टक्के सूट देण्यात आली होती.
अभय योजनेत सुमारे 400 कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले होते. त्यानुसार महसूल जमा झाला. करोनामुळे उत्पन्न घटल्याने विकासकामांवर परिणाम झाला आहे. दरवर्षी महापालिकेस साडेतीन ते चार हजार कोटींचा महसूल मिळतो. मात्र, त्याही स्थितीत जास्तीत जास्त उत्पन्न वाढविण्यासाठी वेगवेगळ्या 4 योजना राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे, पालिकेचे या वर्षीचे उत्पन्न 5 हजार कोटींपर्यंत जावे यासाठीचा अभय योजना हा एक महत्त्वाचा टप्पा होता.
– हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती