प्रशासन सकारात्मक : स्थायी समितीत लवकरच अभिप्राय
पुणे – महापालिकेच्या मिळकतकर विभागाची वाढत असलेली थकबाकी आणि वेगवेगळ्या विभागांच्या घटलेल्या उत्पन्नामुळे पालिकेच्या जमा-खर्चाचा ताळमेळ बिघडला आहे. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्याबाबतचा अभिप्राय प्रशासनाकडून लवकरच स्थायी समितीत ठेवला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थायी समितीत आलेल्या ठरावांवर अभिप्राय देतानाच आयुक्त सौरभ राव यांनी अभय योजनेस हिरवा कंदील दाखविला होता. मात्र, ऐन निवडणुकीपूर्वी अभय योजना जाहीर केल्यानंतर विरोधीपक्षांना प्रचारात भाजपविरोधी खाद्य मिळेल म्हणून सत्ताधारी भाजपकडूनच या योजनेस नकार दिल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या मिळकतकर विभागाची थकबाकी नोव्हेंबर 2019 अखेर तब्बल 4,221 कोटींवर गेली आहे. या थकबाकीत केवळ 1,901 कोटी रुपये मूळ थकबाकी असून दरवर्षी 27 टक्क्यांनी या थकबाकीवर व्याज वाढत आहे. ही व्याजाची रक्कम सुमारे 2,300 कोटींवर गेली आहे. त्यामुळे थकबाकीपेक्षा व्याजाचीच रक्कम अधिक असल्याने अनेक मिळकतधारकांकडून कर भरण्यास तयारी दर्शविली असून महापालिकेने थकबाकीवर लावलेल्या व्याजावर सवलत देण्याची मागणी केली आहे. तसेच, पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी हा निर्णय घ्यावा, असे प्रस्तावही स्थायी समितीत दाखल झाले आहेत. मात्र, त्यावेळी अभय योजना राबविल्यास प्रामाणिक करदात्यांवर अन्याय होईल अशी भूमिका प्रशासनाने घेतली होती.
मात्र, आता प्रशासनाच्या उत्पन्नाच्या आढावा घेताना, पालिकेचे उत्पन्न कमालीपेक्षा अधिक घटल्याने आता प्रशासनाने अभय योजना राबविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानुसार, याबाबत आयुक्त तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सत्ताधारी भाजपने घेतलेल्या पालिकेच्या आढावा बैठकांमध्ये त्याबाबत सहमती दर्शविली होती, तसेच त्याबाबत स्थायी समितीत आलेल्या प्रस्तांवावर सकारात्मक अभिप्रायही दिला होता.
मात्र, निवडणुकीच्या तोंडावर अभय योजनेस मंजुरी दिल्यास राजकीय फायद्याऐवजी टीकेची भीती असलेल्या सत्ताधाऱ्यांनी त्यास नकार दिला. मात्र, त्यानंतरही भाजपला विधानसभा निवडणुकीत फटका बसला आहे. त्यामुळे आता महापालिकेचे घटलेले उत्पन्न लक्षात घेऊन या योजनेस मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.