बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलीवूड सेलेब्समधील वाद उफाळून आला आहे. यात नेपोटिझमवर वाद होत असून आता एक-एक स्टार्स नेपोटिझमवर आपली बाजू मांडताना दिसून येत आहे. या वादात अभिनेता अभय देओल यांचेही नाव जोडले गेले आहे. अभय देओलने देखील इन्स्टाग्राम अकाऊंटवर फिल्म इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे.
अभय देओलची “जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट खूपच गाजला होता आणि आजही लोकांना हा चित्रपट बघायला आवडतो. या चित्रपटामध्ये अभय देओलसह अन्य कलाकारांचीही चाहत्यांनी स्तुती केली होती. आता अभय देओल या चित्रपटाचे उदाहरण देत नेपोटिझमबद्दल बोलला आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचा एक फोटो शेअर करत एक मोठी पोस्ट लिहिली आहे. अभय देओलच्या या पोस्टनंतर ट्विटरवर बरीच चर्चा रंगली आहे.
अभय देओल इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिले की, “जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट 2011मध्ये रिलीज झाला होता, आजकाल मी माझ्यासाठी या चित्रपटाच्या नावाचा जप करत आहे. जेव्हा जेव्हा मी खूप चिंताग्रस्त किंवा तणावग्रस्त असतो, तेव्हा मी हा चित्रपट पाहतो. मी हे सांगू इच्छितो की, सर्व पुरस्कार सोहळयात मला आणि फरहानला मेन लीड्सपासून दूर ठेवण्यात आले आणि आम्हाला “सहाय्यक अभिनेता’ म्हणून नामांकित केले गेले.
दरम्यान, या चिठ्ठीच्या शेवटी त्याने “फॅमिलीफेयरवार्डस’ अशी व्यंग्यात्मक टिपण्णी केले आहे. या एका शब्दात अभय देओलने थेट फिल्म इंडस्ट्रीला लक्ष्य केले.