नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने, मंगळवारी 22,842 कोटी रुपयांच्या बॅंक कर्ज फसवणूक प्रकरणात गुजरातमधील एबीजी शिपयार्ड लिमिटेड विरुद्ध अखेर कारवाई सुरू केली आहे. या कंपनीच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात मुंबई, पुणे आणि सुरतमधील अनेक परिसरांवर छापे टाकण्यात आले आहेत.
या शहरांमध्ये मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) गुन्हेगारी कलमांतर्गत तब्बल 26 ठिकाणी शोध घेतला जात आहे. ईडीने या कंपनीच्या प्रवर्तकाच्या विरोधात फेब्रुवारीमध्ये मनी लॉंडरिंगचा गुन्हा दाखल केला होता.या कंपनीचा अध्यक्ष ऋषी आगरवाल हा या घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार आहे.तो आणि त्याच्या अन्य साथीदारांच्याही विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
स्टेट बॅंकेसह देशातील अन्य सुमारे चौदा बॅंकांकडून या कंपनीने सुमारे 23 हजार कोटी रूपयांचे कर्ज घेतले. ते त्यांनी अन्य बोगस कंपन्यांमध्ये वळवले आणि फसवणूक केली असा त्यांच्यावर आरोप आहे. या कर्जासाठी बोगस कागदपत्रांचा वापर केला गेला असाही आरोप आहे. देशातला हा आजवरचा सर्वात मोठा बॅंक घोटाळा आहे.
याचा सूत्रधार ऋषी आगरवाल याला अद्याप अटक का झाली नाही आणि त्याच्यावर इतक्या विलंबाने कारवाई का गेली असे प्रश्न विरोधी पक्षांकडूनही उपस्थित केले गेले आहेत. मध्यंतरी ऋषी आगरवाल हा विदेशात पळून गेल्याची बातमी आली होती. पण नंतर तो देशातच आहे असे सांगण्यात आले, पण त्याला अजून अटक का करण्यात आली नाही असा प्रश्न कॉंग्रेसने उपस्थित केला होता. दरम्यान ईडीने या संबंधात ठिकठिकाणी जे छापे घातले त्यात नेमके काय जप्त करण्यात आले याचा तपशील अजून जाहीर झालेला नाही.