दिवस कालचा आज संपला, प्रभा उद्याची दिसली रे, विज्ञाने युग हे आले चला स्वागत रे! असे म्हणत मानवाने आशमयुगापासून ते आजपर्यंत स्वतःची प्रगती केली. तंत्रज्ञानाच्या जोरावर चंद्रावरही मानव पोहोचला. परंतु आज मानव या सर्वाच्या पलीकडे जात आहे. हवा, पाणी, डोंगर, झाडे ही मानवाला प्राप्त झालेली नैसर्गिक साधन संपत्ती या संपत्तीचा मानवाने योग्य वापर केला पाहिजे परंतु, या कलियुगात मानव स्वार्थी भूमिका वठवत आहे. या नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिप्रमाणात वापर करू लागले आहे.
निसर्ग मानवाला भरभरून देत आहे पण, मानव त्याचा गैर वापर करताना दिसत आहे. झाडे ही मानवाला जीवन जगण्याचा ऑक्सिजन देतात. झाडे देण्याची भूमिका पार पडतात पण मानव फक्त घेतानाच दिसतो. प्रगतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करतात आणि मोठ्या प्रमाणात इमारती, मेट्रोचे जंगल तयार करतानाचे दिसत आले आहे. “आरे कॉलनी’ अशीच एक समाजातील संकटात सापडलेली कॉलनी आहे. आरे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे. का? जीवन जगण्याचे साधन अन्न, वस्त्र, हवा, पाणी या मूलभूत गरजा मानवाच्या ज्यातून पूर्ण होतात ते म्हणजे झाडे. परंतु प्रगती, विकास, तंत्रज्ञाच्या नावाखाली आज त्यांनाच हद्दपार करताना दिसत आहेत.
“आरे’ अशा ठिकाणी बसलेले ठिकाण की जेथे अनेक वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात आदिवासी वास करत आहेत. ज्या जंगलाच्या आधारे मुंबई उभी आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी आरे कॉलनी, आरे कॉलनी पार्किंगच्या जागेसाठी निवडण्यात आली त्यासाठी तेथील मोठ्या प्रमाणात असलेली झाडे तोडण्यात यावी हा निर्णय घेण्यात आला. मेट्रोचे कारशेड बसविण्यासाठी आरे जंगलातील, झाडांवर कुऱ्ह्याड कोसळणार हे टाळण्यासाठी अनेक पर्यावरण प्रेमी एकत्र आले.
सर्वोच्च न्यायालय. हरित लवाद, वन विभागाचे अरे कॉलनीला वन क्षेत्र मानण्यास नकार दिला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वृक्षरोपण करून हरित क्रांतीचा पाया घातला. या सर्वांना बाजूला सारून प्रगती पथावरील विकसनशील देश या वसुंधरेला छाटण्याचे घातक कार्य करीत आहे. यासाठी सर्वानी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे येथे फक्त पर्यावरण प्रेमीच नाहीतर, प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे.
या आरे प्रकरणाला राजकीय वळण प्राप्त होत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला आज नैसर्गिक साधन संपत्तीची गरज आहे. विकास प्रगती बरोबरच भविष्य-दृष्टिकोन गरजेचा आहे. समाजातील प्रत्येकाने यावर आवाज उठवून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. भविष्य घडवणारे सरकारने वर्तमानही उत्तम करण्याचा ध्यास घेतला पाहिजे.
आरे प्रकरणाचा सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्वच बाजुंनी विचार करून मानवाने मानवाला माणुसकीच्या नात्याने सजले पाहिजे हे महत्वाचे. निर्सगाच्या विरोधात गेल्यावर निसर्ग त्याचे विक्राळ रूप दाखवत आहे. आणि त्यामुळेही जनजीवन विस्कळीत होत आहे. या साठी गरज आहे जनजागृतीची त्यामुळे झाडे हे पर्यावरण जोपासणे प्रत्येक मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
-दीपाली जंगम