Raghav Chadha : आम आदमी पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केलेले राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्याकडे मोठी संसदीय जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यसभेच्या याचिका समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी समितीचे पुनर्गठन करत 10 सदस्यांची नियुक्ती केली असून, हा आदेश 20 मेपासून लागू करण्यात आला आहे. काय काम करते ही समिती ? (Raghav Chadha) राज्यसभेची याचिका समिती ही संसदेमधील महत्त्वाच्या समित्यांपैकी एक मानली जाते. नागरिकांकडून येणाऱ्या याचिका, तक्रारी तसेच जनहिताशी संबंधित विविध मुद्द्यांवर ही समिती विचार करते. सरकारी धोरणे, प्रशासनातील त्रुटी किंवा नागरिकांच्या समस्या यांसंदर्भातील निवेदने तपासून संबंधित मंत्रालयांना सूचना देण्याचे कामही समितीमार्फत केले जाते. हेही वाचा – पुढच्या 72 तासांमध्ये हवामान बदलणार! मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर या समितीत हर्ष महाजन, गुलाम अली, शंभू शरण पटेल, मयंककुमार नायक, मस्तान राव यादव बीधा, जेबी माथेर हिशाम, सुभाशीष खुंटिया, रोंगवरा नारजारी आणि संतोष कुमार पी या खासदारांचाही समावेश करण्यात आला आहे. आप सोडून भाजपात प्रवेश – (Raghav Chadha) Raghav Chadha : मोदी सरकारने राघव चड्ढांवर सोपवली मोठी जबाबदारी; राज्यसभेच्या याचिका समिती अध्यक्षपदी नियुक्ती दरम्यान, सुमारे महिनाभरापूर्वी आम आदमी पक्षातील सात राज्यसभा खासदारांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यात राघव चड्ढा यांच्यासह हरभजन सिंह, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी, स्वाती मालीवाल, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांचा समावेश होता. पक्ष सोडताना राघव चड्ढा यांनी ‘आप’ मूळ विचारसरणीपासून भरकटल्याचा आरोप करत पक्ष देशहिताऐवजी वैयक्तिक फायद्यासाठी काम करत असल्याची टीका केली होती.