नगर -विविध राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांचे गेल्या सात दिवसापासून दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनास आम आदमी पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. मार्केटयार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करुन शेतकरी आंदोलकांच्या मागण्या मान्य करीत शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
या आंदोलनात शहर जिल्हा संघटक प्रा. अशोक डोंगरे, शहर महिला आघाडी अध्यक्षा सुचिता शेळके, रेव्ह. आश्विन शेळके, राजू शेख, अण्णा आळकुटे, रावसाहेब चिंधे, विकास निमसे, सतीश बेरड आदी उपस्थित होते.
भाजपप्रणित मोदी सरकारने बहुमताचा फायदा घेत शेती विधेयक पारित केल्यापासून संपुर्ण देशातील शेतकरी पेटून उठले आहेत. तिन्ही शेतकरी विरोधी कायदे रद्द होण्यासाठी दिल्लीत मागील सात दिवसापासून आंदोलन सुरु असून, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेत नसल्याने दिवसंदिवस या आंदोलनाची धग वाढत आहे. शेतकरी आंदोलकांचे मागण्या मान्य करुन शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे व आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाऊन केंद्र सरकार भांडवलदारांच्या दावणीला बांधले गेले आहे. कायद्याला विरोध दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठी हल्ला, अश्रूधुर व पाण्याचे फवारे मारुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकरी करोनातील टाळेबंदी, नैसर्गिक संकटाने ग्रासलेला असताना शेतकरी विरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दरीत लोटण्याचा हा प्रकार सुरु आहे. याबाबत केंद्र सरकारने तातडीने संसेदत विशेष अधिवेशन घेऊन भाजपप्रणित मोदी सरकारने केलेले शेतीविषयक कायदे रद्द करण्याची गरज असल्याचे यावेळी प्रा. अशोक डोंगरे यांनी सांगितले. यावेळी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.