नवी दिल्ली – दिल्ली महापौर निवडणुकीबाबत आम आदमी पक्षाने आता सर्वोच्च न्यायालयाचा आश्रय घेतला आहे. पक्षाचे म्हणणे आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयाला दोन विनंती करत आहोत. महापौरपदाच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली कालबद्ध पद्धतीने व्हाव्यात, ही पहिली मागणी आहे तर दुसरी मागणी म्हणजे अल्डरमनला मतदानाचा अधिकार देऊ नये. पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज म्हणाले की, महापौरपदाची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी यासाठी विनंती करण्यात आली आहे.
मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज म्हणाले की, दिल्लीच्या जनतेने एमसीडी निवडणुकीत आम आदमी पक्षाला बहुमत दिले आहे. एमसीडीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होऊ दिले जात नसल्याने आम्ही सर्वोच्च न्यायालयात दोन मागण्या केल्या आहेत. अनेक प्रयत्न करूनही ते महापौरपदाची निवडणूक होऊ देत नाहीत, सरकार स्थापन होऊ देत नाहीत. त्यामुळे आता आम आदमी पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवार डॉ.शैली ओबेरॉय आणि सभागृह नेते मुकेश गोयल यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आसरा घेत आपल्या दोन मागण्या मांडल्या आहेत.
यातील पहिली मागणी म्हणजे एमसीडीमध्ये कालबद्ध पद्धतीने सरकार स्थापन व्हावे, न्यायालयाने ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. तर दुसरी मागणी अशी आहे की नामनिर्देशित नगरसेवक म्हणजेच अल्डरमन यांना मतदानाचा अधिकार नाही. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि एमसीडी प्रशासनालाही याबाबत आदेश द्यावेत.
दरम्यान, दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने एकहाती सत्ता मिळवली आहे. मात्र सभागृहातील गदारोळ आणि भाजपा-आप पक्षाच्या नगरसेवकांमधील वाद यामुळे अद्याप दिल्लीला महापौर तसेच उपमहापौर मिळू शकलेले नाहीत. मंगळवारी देखील फक्त नगरसेवकांचाच शपथविधी सोहळा पार पडला. याच कारणामुळे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी भाजपाने आपला पराभव स्वीकारावा आणि महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सहाय्य करावे, असे आवाहन केले आहे. त्यानंतर आता हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.