सतत चर्चेत राहण्याचे कसब सगळ्यांकडे नसते. केवळ दोन प्रोफेशनमधील व्यक्तींनाच ही किमया साधता येते. एक राजकारणी आणि दुसरे चित्रपटसृष्टी. खरेतर राजकारणाला प्रोफेशन म्हणणे अयोग्य. ते लोकसेवक असतात. मात्र, आपल्या लोकशाहीचे चाकच असे फिरतेय की लोकसेवक मालक झाले आहेत. पण आता तो विषय नाही. विषय प्रकाशझोत आपल्यावरच राहील याची दक्षता घेण्याचा आहे. या दोन क्षेत्रांत नसतानाही काहींना ते सहज जमते. त्यात योगगुरू बाबा रामदेव यांचा समावेश आहे.
योग शिक्षा दिल्यानंतर ते फावल्या वेळात राजकारणाच्याच प्रांतात शिरतात. निवडणुकींच्या वेळी तर उघड भूमिका घेतात. अनुयायी वर्ग मोठा असल्याने त्यांच्या सूचनांचे पालन केले जाते. एकूण बाबांचे चांगले चालले आहे. त्यांनी योगप्रसारासोबतच इतर उद्योग सुरू केले आहेत. त्यांचाही गवगवा केला जातो. ब्रॅंडिंग केले गेले आहे. आपल्या ब्रॅंडचा प्रसार करण्यासाठी स्वत: बाबा विविध मुद्रांमध्ये झळकत असतात. त्याला हरकत घेण्याचे काही कारण नाही. जोपर्यंत सगळे नियमाने चालले आहे, कोणाच्या अधिकारांचे उल्लंघन होत नाहीये, कोणाला हानी पोहोचत नाहीये तोवर प्रत्येक जण आपला मुखत्यार आहे. आता हेच बाबा आठवडाभर चर्चेत आहेत. निमित्त ठरले करोनाचे.
करोनावर आम्ही औषध तयार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या पतंजली संस्थेचे आचार्य बालकृष्णन यांनीही तोच दावा केला आहे. गरम पाणी पिल्याने करोना बाधत नाही येथपासून ते लिंबूपाणी, हळदीचे दूध, आल्याचा चहा आणि अमुक तमुक काढा घेण्यापर्यंत हजारो सल्ले रोज दिले जात आहेत. भांबावलेली जनता त्यांचे पालनही करत आहे. कोणी सल्लागाराची पार्श्वभूमी विचारत नाही. त्याचा अभ्यासही करत नाही. कोणाच्या का कोंबड्याने असेना, उजाडणे महत्त्वाचे अशी गत. करोनाने तशी वेळच आणली आहे. कोणती लस विकसित झाली का, औषध सापडले का, यावर सर्वसामान्यांची आणि अतिविशेष व्यक्तींचीही नजर. याबाबतच्या बातम्यांचा माग ठेवला जातोय.
सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड केले जात आहेत. खबरदारी घेण्याचे सर्व उपाय केले जात आहेत. प्रसंग असा बाका असताना चुकीचे काही होणे धोक्याचेच. तेच झाले किंवा होतेय का, अशी स्थिती बाबांच्या “कोरोनिल’ या औषधामुळे निर्माण झाली आहे. राजस्थान राज्याच्या पाठोपाठ महाराष्ट्र सरकारनेही “कोरोनिल’वर बंदी घातली आहे. बाजारात येण्यापूर्वीच औषध बदनाम झाले आहे. त्याचे कारणही धक्कादायक आहे. या औषधाने करोना बरा होतो, असा दावा केला गेला. किती लोक बरे झाले याचे आकडेही दिले गेले. मात्र औषधाची चाचणी घेतली होती का? कुठे आणि कशी घेतली होती? कोणावर घेतली होती, याचे काहीही पुरावे नाहीत. बरे अशी औषधे बाजारात उपलब्ध करून देण्यापूर्वी त्याची रितसर माहिती आणि अन्य बाबींची पूर्तता करावी लागते. आपल्या दाव्यांच्या पुष्ट्यार्थ पुरावे द्यावे लागतात. ते या प्रकरणात झालेले दिसले नाही. केवळ आम्ही सांगतो म्हणून यामुळे करोना बरा होतो असा अविर्भाव. तसे करून कसे चालणार? सर्दी आणि खोकला ही करोनाची लक्षणे सांगितली गेली आहेत. मात्र, प्रत्येक सर्दी आणि खोकला आणि करोना एकच असण्याचे कारण नाही. करोनात थोडा जरी उशीर झाला तर विनामोबदला वरचे तिकीट फाडले जाते.
भारतात मृत्यूदर कमी आहे. हे वाचायला सांगायला ठीक. मात्र मृत्यूदर वाढवण्याचा सामान गोळा करायचा परवाना आपल्याला कोणी दिलेला नाही. ज्या आजाराकरता जगभरातले तज्ज्ञ रात्रंदिवस झटत आहेत त्यांचे औषध भारतात जर स्वस्तात मिळत असेल तर ते कोणाला नको आहे? मात्र, ते औषधच असायला हवे. अन्यथा साप चावला म्हणून, भूताची बाधा झाली म्हणून मांत्रिकाकडे जाणाऱ्यांची संख्या आपल्याकडे कमी नाही. अशा समाजात आपण जेव्हा दावा करतो तेव्हा आपण स्वच्छ असले पाहिजे. अन्यथा असंख्य जीवांशी खेळ करण्याचाच हा प्रकार होईल. बाबांचे सत्ताधाऱ्यांशी चांगले संबंध असतात. त्यांना ते जमते. गेल्या काही वर्षांत त्यांनी बिस्किटापासून साबणापर्यंत आणि अगदी मुलांना माध्यान्ह भोजन देण्याचे कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न करण्यापर्यंतचे सर्व प्रकार केले आहेत.
“नमामी गंगे’ मोहिमेंतर्गत गंगेवरील घाटांच्या सुशोभिकरणाचे काम मिळण्याकरताही ते प्रयत्नशील होते. अलीकडेच याबाबतच्या बातम्या आल्या होत्या. काही कामे त्यांना मिळाली. मात्र, बऱ्याच ठिकाणी नकारही ऐकावा लागला. हे सगळे का होते, याचा त्यांनी सवडीने विचार करावा. पण करोनासारख्या विषयाला हात घालताना मात्र त्याचा खूप अगोदरच विचार करणे आवश्यक होते. आपण परस्पर कोणते औषध लॉंच केले अन् त्याला अर्ज न करता मान्यता दिली जाईल, हे गृहीत धरणे कॉन्फिडन्स की ओव्हर कॉन्फिडन्स? दोन दिवसांनी आणखी धक्कादायक बाब उजेडात आली. औषधासाठी जो रितसर परवानगी अर्ज आता करण्यात आला आहे, त्यातून करोनाच गायब आहे. केवळ सर्दी आणि खोकल्याचाच तेवढा उल्लेख आहे. असे जर असेल तर मग करोनाच्या नावाने शंख का फुंकले? योग,
आयुर्वेद हा भारतीयांच्या श्रद्धेचा विषय आहे. ते योग एकवेळ करणार नाहीत; मात्र त्याबद्दल प्रचंड आस्था आहे. तेच आयुर्वेदाचेही. त्याची मात्रा लागू पडतेच असा विश्वासही एका टप्प्यावर दृढ होतो. करोनाच्या घरगुती लढ्यात सध्या याच श्रद्धेतून घरी काढे आणि इतर उपाय केले जात आहेत. त्याच्याने किमान सकारात्मकता तरी राहते. त्याचा लाभच होईल. मात्र, आम्ही लोकांना करोनामुक्त केले म्हणत ओैषध बाजारात आणण्याचे सरसकट धाडस करणे हा आगीशी खेळच ठरतो. त्यातून हात पोळण्याशिवाय व प्रसंगी होरपळण्याशिवाय काही हाती येणार नाही.
आयुष मंत्रालयाने योग्य वेळी हस्तक्षेप करून हा प्रकार तूर्त रोखला हे बरे झाले. महाराष्ट्रासारख्या राज्यांनीही दक्षता घेतली. राहीला प्रश्न योगगुरू बाबा रामदेव यांचा. तर भारताच्या योगशास्त्राला जगभरात प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा निश्चितच मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना मोठेपणही प्राप्त झाले आहे. हे मोठेपण वागवताना अधिक जबाबदारीने बोलणे आणि दावे करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. अन्यथा ज्यांनी मोठेपण दिले त्यांच्याशीच प्रातारणा केल्यासारखे होईल.