वाई (अनिल काटे) – महाराष्ट्र शासनाच्या जनहितार्थ असलेल्या सुलभ सोप्या अटींना फाटा देत वाई तालुक्यामध्ये महसूल अधिकाऱ्यांनी जाचक अटी करून महा ई सेवा केंद्रांची आटाचक्की बनवली आहे. त्यात गेली दोन वर्षे वाई तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काची आधारकार्डस् भरडण्याचे काम महसूल अधिकाऱ्यांमार्फत केले जात आहे.
या अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय व बेजबाबदार धोरणामुळे जनतेचा हक्काचा “आधार’ महसूल प्रशासनाच्या कचाट्यात सापडला असून, सर्वसामान्य नागरिक, पालक व विद्यार्थ्यांना आधारविना “निराधार’ व्हावे लागत आहे. ही बाब गंभीर असून वाईतील महसूल अधिकाऱ्यांच्या कारभाराला जनता वैतागली आहे. याची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पातळीवरून जनतेला सुलभ पद्धतीने आधारकार्ड व अन्य कागदपत्रे मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.
राज्याच्या मुख्य सचिव यांचे पत्र क्रं. डीआयटी-2018/सीआर91/एस1/39-12 सप्टेंबर 2018 च्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आधार प्रकल्प/कवि/531/18 प्रमाणे दि. 30 ऑक्टोबर 2018 रोजी वाईच्या तहसीलदारांना लेखी आदेशाद्वारे, तालुक्यातील महाऑनलाइन या नोंदणी संस्थेमार्फत कार्यान्वित असलेले सर्व आधार किट (महा-ई-सेवा केंद्र) शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी स्थलांतरीत करून, महा-ई-सेवा केंद्रचालकांना परवानगी पत्र, पुरेशी जागा, ऑफिस फर्निचर, वीज, इंटरनेट कनेक्शन, ऑपरेटर आदी सुविधा तात्काळ पुरवण्यास सांगितले होते; परंतु जागा उपलब्ध करून देण्याऐवजी तहसीलदारांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली.
तहसीलदारांच्या उदासीनतेमुळे दोन वर्षे उलटूनही महा-ई-सेवा केंद्रचालकांना शासकीय अगर पर्यायी जागेची व्यवस्था केली जात नसल्याने शहरी व ग्रामीण भागातील आधारकार्ड प्रक्रिया पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना आधारकार्ड व संबंधित बाबींकरिता निराधार व्हावे लागत आहे.
राज्याचे मुख्य सचिव व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असूनही दोन वर्षांत तहसीलदारांनी महा-ई-सेवा केंद्रचालकांना जागा उपलब्ध न करता नागरिकांना वेठीस धरले आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
सध्या आधारकार्डचे काम भारतीय स्टेट बॅंक व बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये सुरू आहे; परंतु या राष्ट्रीयीकृत बॅंकांची कामकाज पद्धती पहाता सामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. बॅंकेसमोर दिवसेन्दिवस रांगा लावूनही आधारकार्ड मिळत नाही.
एका दिवशी फक्त 30 लोकांची कामे होत असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासूनच आधारकार्ड व संबंधित कामाकरिता लोकांना बॅंकेच्या दरात उभे रहावे लागत आहे. याची चाड महसूल अधिकाऱ्यांना नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
महा-ई-सेवा केंद्रांमधील आधार सुविधा बंद असल्याने नवीन आधारकार्ड, नाव दुरुस्ती, नावात बदल, निवासाच्या पत्त्यातील बदल, आधार- मोबाइल लिंक व अन्य कामे तातडीने होत नसल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळा, महाविद्यालयातील प्रवेश, फी, बॅंक खाते अशी कामे अडकून पडली आहेत.
महा-ई-सेवा केंद्रचालकांनी तहसीलदारांची वारंवार भेट घेतली. वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केले, तरी जागा उपलब्ध नसल्याचे सांगत, साहेब हात वर करत आहेत. तालुक्यातील राजकीय पदाधिकारी व सामाजिक संघटनांनी याबाबत आवाज उठवून नागरिकांना आधारकार्ड मिळण्याची सोय तातडीने करावी, अशी मागणी होत आहे.