पुणे – या अगोदर अनिवासी भारतीयांना आधारकार्ड मिळण्यासाठी 182 दिवस प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार आता भारतीय पारपत्र असलेल्या अनिवासी भारतीयांना भारतात पोहोचल्यानंतर लगेच आधार कार्ड मिळू शकणार आहे.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे युआयडीएआयने जारी केलेल्या माहितीनुसार अनिवासी भारतीय भारतात आल्यानंतर ते बायोमेट्रिक ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी त्यांनी येण्याच्या अगोदर वेळ घेतली पाहिजे. पूर्वी याकरिता 182 दिवसांचा कालावधी लागत होता. अनिवासी भारतीयाकडे भारतीय पारपत्र त्यांच्या ओळखीचा पुरावा म्हणून गृहीत धरण्यात येईल. पारपत्रावरील पत्ता आणि जन्मतारीख गृहीत धरण्यात येईल. जर पत्रावर भारतातील पत्ता नसेल तर त्यांना भारतातील संपर्काच्या स्थळाची माहिती द्यावी लागेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 5 जुलै रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनिवासी भारतीयांना भारतात आल्यानंतर लगेच आधारकार्ड देण्याच्या शक्यतेवर काम चालू असल्याचे सांगितले होते. अनिवासी भारतीयांनी याकरिता वेळोवेळी मंत्रालय आणि गृहमंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. त्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे. अनिवासी भातीयांनी यासाठी अनेक वर्षांपासून मागणी केली होती.