नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाने राजकीय भवितव्याचा विचार करून कृती करावी. गांधी परिवाराऐवजी पक्षाचे नेतृत्व सचिन पायलट किंवा त्याच्या सारख्या एखाद्या तरुण तडफदार नेत्याकडे सोपवणे आवश्यक आहे, असे कॉंग्रेस नेते आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री नटवर सिंह यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस ज्या पद्धतीने सध्या काम करत आहे ते बघता 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासमोर कॉंग्रेसचे आव्हान दिसत नाही. भारताचे सध्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या कामगिरीमुळे देशाची प्रतिष्ठा वाढत असल्याचे दिसत आहे, असे नटवर सिंह म्हणाले.
नटवर सिंह हे यूपीए सरकारच्या काळात काळात देशाचे परराष्ट्रमंत्री होते. इराणला अन्नधान्य पुरवणे आणि त्यांच्याकडून तेल आयात करणे असा व्यापार त्या काळात भारत करत होता. हा अन्नाच्या बदल्यात तेल आयात करण्याचा व्यापार सुरू असताना नटवर सिंह आणि त्यांच्या मुलाने मिळून मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला.
या प्रकरणात राजकीय कोंडी निर्माण झाली आणि कॉंग्रेसने नटवर सिंह यांना परराष्ट्र मंत्रीपदावरून हटवले. यानंतर नटवर सिंह सक्रीय राजकारणातून मागे पडले. त्यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून केलेल्या कामाची माहिती देणारे पुस्तक प्रचंड वादग्रस्त ठरले होते.
आधी राहुल गांधी आणि नंतर सोनिया गांधींची ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणात चौकशी केली. प्रत्येकवेळी गांधी परिवाराचे सदस्य ईडी कार्यालयात जाण्याच्यावेळी कॉंग्रेसने रस्त्यावर आंदोलन केले. काही ठिकाणी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंसक आंदोलन केले. या घडामोडींवर नटवर सिंह यांनी नाराजी व्यक्त केली. आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना कॉंग्रेस गरजेची आहे. पण कॉंग्रेस पक्षाला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची गरज उरलेली नाही.