सातारा: वेळे कामथी, ता. सातारा येथे आज ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लता विजय चव्हाण ( वय ५०) रा.वेळे कामथी, ता. सातारा ही महिला आपल्या मुलगा विश्वजीत विजय चव्हाण ( वय ३२) याच्या सोबत राहतात. त्यांचे पती विजय चव्हाण यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. विश्वजीत चव्हाण हे मतिमंद असल्यामुळे त्यांना त्याची नेहमी काळजी लागून राहत असेल. आज सकाळी त्या आपल्या सहकारी महिलांसह भात लागण करण्यासाठी माळ नावाच्या शिवारात गेल्या होत्या. काम झाल्यानंतर मुलाच्या काळजीने त्या आपल्या सहकारी महिलांसह घराकडे जात असताना माळ नावाच्या शिवारात सायंकाळी ५.३० वाजता मुसळधार पावसाने सुरुवात केली.
सर्वत्र पाऊस पडत असताना चालत जात असताना चिखलामध्ये घसरून त्या ओघळीत पडल्या. ओघळीच्या पाण्याचा प्रवाह वेगाने असल्यामुळे पाण्यात वाहत त्या ओढ्यातील पुरात वाहत गेल्या. पावसामुळे ओढ्याला प्रचंड मोठा पूर आला होता. ही घटना ग्रामस्थांना समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन लता चव्हाण यांची शोधाशोध सुरू केली. घटनास्थळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर लता चव्हाण यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. रात्री ८.३० वाजता त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शोधन झाल्यानंतर रात्री उशिरा त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. लता चव्हाण यांच्या मृत्यूने त्यांचा मतिमंद असलेला विश्वजीत हा मुलगा पोरका झाल्यामुळे ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.