नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनिष तिवारी यांच्यात शनिवारी स्वदेशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीवरून ट्विटरवर शाब्दिक युद्ध रंगले.
योग्य प्रक्रियेचा अवलंब न करता कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल्याविषयी तिवारी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर, तिवारी यांना केवळ अफवा पसरवण्यात रस असल्याचा पलटवार वर्धन यांनी केला.
भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड या दोन लसींचा प्रत्यक्ष वापर सुरू झाल्याच्या दिवशीच ट्विटर वॉर पाहावयास मिळाले. तिवारी यांनी मोदी सरकारमधील मंत्र्यांनी लस का घेतली नाही, असा सवाल केला. इतर अनेक देशांच्या प्रमुखांनी लसीकरणाचा प्रारंभ करताना सर्वप्रथम लस घेतली.
लस सुरक्षित असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी ती कृती केली. तसा संदेश देण्यासाठी आपले मंत्री का पुढे आले नाहीत, अशी विचारणा त्यांनी केली. त्याला वर्धन यांनी प्रत्युत्तर दिले.
तिवारी यांनी डोळे उघडून छायाचित्रे पाहिल्यास त्यांना नामवंत डॉक्टरांनी आणि सरकारमधील उच्चपदस्थांनी लस घेतल्याचे आढळेल. लस विकसित करण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांनी वेगाने कार्य केले. त्यामध्ये सुरक्षिततेलाच प्राधान्य होते, असे वर्धन यांनी म्हटले.