नवी दिल्ली : सध्या देशात केदारनाथ बद्रीनाथ यात्रा सुरु आहे. त्यासाठी देशभरून भाविक उत्तराखंडमध्ये दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गंगोत्रीला जात असताना कार दरीत कोसळून आग लागल्याने सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. यानंतर काल उत्तरकाशीमध्ये आणखी एक भीषण अपघात झाला असल्याही माहिती समोर आली आहे.महाराष्ट्रातीलच भाविकांचा भीषण अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील भाविकांची बोलेरो कार यमुनोत्रीच्या मार्गावर असताना वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळली. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत.मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असून काही जण अंधेरी तर काहीजण भंडारा जिल्ह्यातील आहेत. जखमींना बडकोट आणि नौगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
गुरुवारी सायंकाळी उशिरा हा अपघात झाला. १२ भाविकांना घेऊन हे वाहन जानकीचट्टीहून बड़कोटला निघाले होते. रात्री उशिरा ही कार यमुनोत्री धामपासून २८ किमी दूर ओजरीजवळ असताना दरीत कोसळले. समोरून येणाऱ्या बसला तीव्र वळणावर साईड देत असताना चालकाने कार मागे घेतली. याचवेळी नियंत्रण गमावल्याने पाठीमागे दरीत जाऊन कार कोसळली.
पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने शोध आणि बचाव कार्य राबवत चार लहान मुलांसह दहा जखमी प्रवाशांना दरीतून वर आणले. अपघातस्थळी रस्ता अरुंद असून सुरक्षेसाठी संरक्षक कठडे देखील नाहीत. मृत आणि जखमी सारे महाराष्ट्रातील आहेत.