पिंपरी – “वाईट संगतीमुळे गुन्हेगारीकडे वळलो. माझ्यावर 16 गुन्हे दाखल आहेत. लग्नानंतर गुन्हेगारी सोडून दिली. उपजीविकेसाठी दारूचा धंदा सुरू केला. मात्र पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर दारूच्या धंद्यावरही धाडी पडू लागल्याने आता पानाची टपरी टाकली आहे. आता मला सन्मानाने जगायचय,’ या शब्दात एकेकाळी सराईत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महादेव साठे याने आपल्या भावना व्यक्त केल्या. आयुक्तांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी सुरु केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.
सातवीपर्यंत मोफत शिक्षण असल्याने शिकलो. वडील मजुरी करून कुटुंब चालवत असे. आठवीत गेल्यावर अभ्यासासाठी वह्या-पुस्तके नव्हती. तशी शाळेची गोडीही कमीच होती. त्यात वाईट मुलांच्या संगतीत आल्याने शाळेला दांडी मारून बाहेर फिरू लागलो. ही बाब वडीलांना कळाल्यावर त्यांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर शाळा कायमचीच सुटली. वाईट मुलांसोबत राहून गुन्हेगारीकडे वळलो.
1998 मध्ये चोरीचा पहिला गुन्हा केला. त्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रात मागे वळून पाहिलेच नाही. खायचं-प्यायचं आणि मजा करायची, एवढेच काम सुरू होत. 2012 पर्यंत माझ्यावर चोरी, जबरी चोरी, मारहाण, गंभीर दुखापत, खूनी हल्ला, दरोड्याची तयारी असे तब्बल 16 गुन्हे दाखल झाले. लग्न झाल्यावर पत्नीने गुन्हेगारी सोडण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा कधीही गुन्हा केला नाही. मात्र कुटुंबाचा उदहनिर्वाह करण्यासाठी दारूचा धंदा सुरू केला. महिन्याला जेमतेम पाच-सहा हजार रुपये मिळत होते.
पोलिसांकडून मदतीचा हात
साठे यांनी सांगितले की, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर माझ्या धंद्यावर दिवसाआड धाडी पडू लागल्या. पोलीस येऊन दारू ओतून द्यायचे. ग्लासेस फोडायचे. दारू पिण्यासाठी आलेल्यांनाही मारहाण करीत असे. पोलीस हवालदार सतीश ढोले यांनी दुसरा काहीतरी व्यवसाय करण्यास सांगत मला वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्यासमोर हजर केले. त्यांनीही दारू धंदा बंद करण्याची सक्त ताकीद दिली. तसेच गुन्हेगारीकडे न वळता सन्मानाने व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ती मदतही केली.
मुलांना शिकवून मोठे करणार
पाच हजार रुपये टपरीसाठी लागले आणि त्यात माल भरण्यासाठी पाच हजार असे एकूण 10 हजार रुपये खर्च झाले आहेत. नवीन धंदा असल्याने रुळाण्यासाठी थोडा वेळ लागेल. मात्र पुन्हा कधीही गुन्हेगारी आणि दारूधंद्याकडे वळणार नसल्याचे त्याने ठामपणे सांगितले. आता दोन मुले झाली असून त्यांनाही शिकवून मोठे करायचे आहे. काही दिवसानंतर टपरीचा व्यवसाय पत्नीकडे सोपवून आपण प्लंबिंग, पेंटींग किंवा बिगारी काम करणार असल्याचे महादेव साठे याने सांगितले.