ग्रामीण भाग कोरडाच : 24 तासांत 58 मिली पावसाची नोंद
श्रीगोंदा – श्रीगोंदा शहरात गेल्या दोन दिवसांत पावसाने दमदारी हजेरी लावली आहे. 24 तासांत श्रीगोंदा शहरात 58 मिली पावसाचे नोंद झाली आहे. शहराच्या तुलनेत मात्र ग्रामीण भागात नाममात्र सरी बरसल्याने शेतकरी अद्याप पावसाच्या प्रतीक्षतेच आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाने कमबॅक करत सुखद धक्का दिला. मात्र पावसाचा जोर सर्वत्र आढळून आला नाही. शहरात काही कालावधीत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते.
महसूल विभागाच्या आकडेवारी नुसार गुरुवारी सकाळ पर्यंत शहरात 58 मिली पाऊस नोंदविला गेला आहे, तर ग्रामीण भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
शहरात पाऊस झाल्याने नागरिक सुखावले असले, तरी ग्रामीण भागात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिके माना टाकू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. आवर्तन आल्याने काही ठिकाणी भरणे झाले आहे. मात्र हे पाणी सर्वत्र मिळाले नसल्याने पाटपाण्याखालील शेतातील पिकेही जळण्याच्या मार्गावर आहेत. लवकरच पाऊस न झाल्यास पिके हातची जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. मागील वर्षी दुष्काळामुळे एकही पीक हाती लागले नाही. यंदाही पाऊस न झाल्यास पुन्हा शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जाणार आहे.