फक्त लाखभर शेतकऱ्यांना मिळाली आर्थिक मदत
पुणे – ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने विभागातील पाचही जिल्ह्यांतील 8 लाख 73 हजार 678 शेतकऱ्यांचे 4 लाख 89 हजार 817 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अर्थसहाय्यासाठी 150 कोटींचा निधी मंजूर केला होता. हा संपूर्ण निधी सुमारे 3 लाख 40 हजार शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यासाठी 136 कोटी रुपयांची गरज असून, केवळ 39 कोटी 55 लाख 15 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. तो निधी 1 लाख 1 हजार 311 शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला आहे.
विभागात अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान सोलापूर जिल्ह्यात झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांत कमी नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी 64 कोटी रुपयांची गरज असून, प्रत्यक्षात 17 कोटी 57 लाख 57 रुपयांचा निधी प्राप्त झाला. हा निधी 56 हजार 480 शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला आहे.
सांगलीमध्ये 116 कोटी रुपयांची गरज असून, 34 कोटी 48 लाख 42 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी 51 हजार 875 शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून, 204 कोटींची गरज असून, 58 कोटी 15 लाख 10 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. तो 1 लाख 14 हजार 659 शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले असून, कोल्हापूर जिल्ह्यासाठी 1 कोटी 53 लाखांच्या निधीची आवश्यकता असून, 38 लाख 65 हजार रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी 36 लाख 98 हजार रुपये 2 हजार 388 शेतकऱ्यांना वाटप केले आहे.