जागावाटपापूर्वीच निवडणुकीची तयारी
भोसरी – लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा पराभव नक्की असून त्यांना पराभव आतापासून दिसू लागल्याने विरोधक ईव्हीएम मशीनवर खापर फोडू लागले आहेत. केवळ पराभव मानसिकेतूनच हा संशय निर्माण केला जात असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या विधानसभा निवडणुकीच्या वॉररुमचे उद्घाटन माधव भांडारी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी वरील आरोप केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, विरोधकांनी ईव्हीएम मशीनबाबत वारंवार संशय निर्माण करण्याचे काम केले आहे. यातून निवडणूक आयोगाबाबतही संशयास्पद वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका फेटाळली गेल्याने जनतेसमोर सत्य आले असून विरोधकांचा खोटा चेहरा उघड
झाला आहे.
लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, केंद्रात मोदी यांचे सरकार बहुमताने येणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रात शिवसेना -भाजपा युती 42 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आघाडी सरकारच्या कामकाजावर टीका करतानाच युती शासनाने चांगले काम केल्याने पुन्हा राज्यातही युतीचेच सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेना -भाजपाची सन 2014 साली युती झाली नसली तत्पूर्वी 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतील युतीच्या जागावाटपामध्ये भोसरीची जागा ही शिवसेनेकडे आहे. अद्याप शिवसेना भाजपाचे विधानसभेसाठी जागावाटप जाहीर होणे बाकी आहे. विधानसभेसाठी 50/50 टक्के फॉर्म्यूला लोकसभा निवडणुकीच्या युतीवेळीच जाहीर करण्यात आला आहे. शहरातील तीन पैकी 2009 साली शिवसेनेकडे 2 जागा होत्या. त्यामध्ये भोसरी आणि चिंचवडचा समावेश आहे.
सध्या या दोन्हीपैकी एका जागेवर भाजपाचा तर दुसऱ्या जागेवर भाजपाचे सहयोगी आमदार आहेत. जागावाटपाची घोषणा होण्यापूर्वीच लांडगे यांनी भोसरीतून सुरू केलेल्या तयारीमुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र भोसरीच्या जागेवर भाजपाचा सहयोगी आमदार असल्याने ही जागा भाजपाच्याच वाटेला येईल, असा दुजोरा माधव भंडारी यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे महेश लांडगे हे निश्चित झाले असले तरी युतीमधील कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.