नवी दिल्ली – आगामी उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्या तर, विरोधी पक्षांकडून राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गरेट अल्वा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वीच विरोधी पक्षात फुट पडल्याचे दिसून येत आहे.
तृणमूल कॉंग्रेसने आगामी उपराष्ट्रपती निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले असून टीएमसीच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षाच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. याबाबतची घोषणा टीएमसीचे नेते आणि खासदार अभिषेक बनर्जी यांनी केली आहे.
दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बनर्जी म्हणाले, एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण राज्यपाल असताना जगदीप धनखड यांनी सरकारशी समन्वयच साधला नाही. तसेच, विरोधकांनी सल्लामसलत न करता अल्वा यांच्या नावाची घोषणा केली आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांची गुरुवारी बैठक झाली. यात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बनर्जी यांनी म्हटले आहे.
नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी 25 जुलैला? किती असेल वेतन ? जाणून घ्या राष्ट्रपतींचे अधिकार
बनर्जी पुढे म्हणाले, तृणमूल कॉंग्रेसला विश्वासात न घेता विरोधी उमेदवार जाहीर करण्याच्या प्रक्रियेशी आम्ही सहमत नाही. अल्वा यांच्या निवडीबाबत विरोधी गटातील कोणत्याही पक्षाने आमच्याशी चर्चा केली नाही, की आमचे मतही विचारले नाही. त्यामुळे आम्ही विरोधी उमेदवाराला पाठिंबा देवू शकत नसल्याचे बनर्जी म्हणाले.