मुंबई – 1952 साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज (दि.15) जयंती आहे. त्यांची आठवण आणि त्यांच्या कार्याला सलाम म्हणून गुगलकडून मराठी मातीतल्या कुस्तीपटूला खास मानवंदना देण्यात आली आहे. त्यांनी भारताला 70 वर्षांपुर्वी पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. आणि याच कर्तुत्वाची दखल आज गुगलने घेतली आहे.
दरम्यान, आता हाच धागा पकडून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खाशाबा जाधव यांच्या कार्याला उचित सन्मान देऊन अभिवादन करण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे. खाशाबा जाधव यांना पद्म किंवा पद्मविभुषण मिळावा यासाठी संसदेत पाठपुरावा करण्याता आला परंतु अद्यापही सरकारकडून कोणतीही दखल घेतली नाही. आणि यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आवाज उठवला असल्याचं दिसून येत आहे. या संदर्भातील एक भलीमोठी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
नेमकं संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले…
गुगलने दखल घेतली पण सरकारने नाही ! 1952 साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती. त्यांच्या जयंती निमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. मात्र त्यांच्या कार्याला उचित सन्मान देऊन अभिवादन करण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, हाच प्रश्न आहे.!
देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या खेळाडूस सरकारकडून “पद्म” पुरस्काराने सन्मानित केले जाते. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. मात्र ज्यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले ते पैलवान खाशाबा जाधव अजूनही पद्म पुरस्कारापासून वंचित आहेत. मी खासदार असताना 2017 ते 2022 अशी सहा वर्षे सलग, खाशाबांना मरणोत्तर “पद्मविभूषण” मिळावा, यासाठी केंद्रात सर्व पातळीवर वारंवार पाठपुरावा केला, मात्र शेवटी उपेक्षाच झाली.
आता तरी सरकारने जागे व्हावे. या महान मल्लावर ऑलिम्पिकच्या मैदानातही अन्याय झाला होता, तरीदेखील देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिद्दीने जिंकून आणणाऱ्या खाशाबा जाधव यांना “पद्म” पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव करणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल…’ या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.